Wednesday, November 12, 2014

पानगळ नव्हे बहर

पानगळ सुरु झाली कि मला नेहमी प्रश्न पडायचा , झाडाला नसेल का होत दुक्ख आपलीच पाने सोडून देताना ? श्रावणात बहर आल्यावर लोक त्या झाडापाशी उभे राहून सौंदर्याची तारीफ करत असतात , प्रेमी युगुलांना ते आपलेच  वाटत असते , पंथास्थाना  ते निवांतपणा  देणारा आसरा वाटत असते. सौंदर्याची लयलूट होणारे मोसम , ती श्रीमंती , तो थाट अनुभवणारे झाड अचानक पानगळ आली म्हणून सगळे अगदी एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे सोडून देते ? कसे काय जमत असेल . नसतील का होत वेदना ?

मला माझ्या कामाचा शेवट अगदी नजरेच्या टप्प्यात येईपर्यंत वाटत होते कि झाडाला पण वाटत असेल वाईट . मला सुद्धा वाटले.  एक एक पान टाकून देणाऱ्या झाडाप्रमाणे मी एक एक जबाबदारी हातावेगळी करत होते. मी माझे वाटणारे एक एक नियमित वापरातले साहित्य कामाच्या प्रोसेस प्रमाणे रिलीज करत होते. तेव्हा आता हे आपण पुन्हा वापरणार आहोत कि नाही हे चित्र सुद्धा स्पष्ट होत नव्हते. अगदी क्रेडीट कार्डला बंद केले तेव्हा हे आता शेवटचे काम. आता जाताना फक्त माझा रोजच्या वापराचा पी सी मी सोडून देणार कि समाप्ती .पण पुढे काय असा एक उगाचच प्रश्न

पण मग मला त्या झाडामध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य  दिसले. पानगळ येते तीच नव्या पालवीची ओळख घेऊन . कोणत्याही गोष्टीचा शेवट नसतोच कधी . ती तर एका नवीन सुंदर गोष्टीची सुरुवात असते, किंबहुना आत्तापर्यंत झाडाला मिळालेल्या सौंदर्यात त्याला जी ओळख नव्हती मिळाली ती त्या पालवीने मिळणार असते. आता डेरेदार नसेल झाड…  पण एक सृजन कलाकार येउन झाडाला पाहून म्हणतो " तुझ्याकडे पाहतानाच आयुष्यात नवीन पालवी फुटण्याची आशा मिळते . जगण्याची खरी उमेद तुझ्याकडूनच तर मिळते. "

पानगळीचे हे आगळे रूप सृजन मनालाच कळेल . सौंदर्याचा आस्वाद घेणारा असो , कि प्रेमी युगुल कि कोणी पांथस्थ..  प्रत्येकासाठी झाडाचे बहरलेले रूप क्षणिक सुख होते. पण पालवीने आयुष्याला उमेद दिली होती नव्याने जगण्याची !!

माझ्या कामाचा शेवट करताना माझ्या आयुष्यात येणारी उमेद आहे माझी नवीन भूमिका !! माझे नवीन आयुष्य हे या  आत्ता बहारदार वाटणाऱ्या आयुष्यासारखे  क्षणभंगुर नाही . मला आता एक कायमची ओळख मिळणार आहे. आई असण्याची ओळख . जी शाश्वत आणि कायमस्वरूपी असेल. एका निस्वार्थी , निरपेक्ष आयुष्याची सुरुवात असणार आहे ती  . या जाणीवेने मन अगदी बहरलय !! श्रावणात डेरेदार दिसणाऱ्या झाडासारखेच… जे पानगऴ  होऊन गेल्यावरच बहरते !! हि पानगळ नव्हे  हा तर आहे बहर ….  सौंदर्याचा बहर 

Monday, October 13, 2014

निरागसपण

पहाटे  पहाटे  जाग आली . डोळे किलकिले करून पाहिले तर शेजारी माझे गोंडस बाळ शांतपणे निजलेले . तीच निरागसता अजूनही चेहऱ्यावर आहे जी पहिल्यांदा मी हात हातात घेतला तेव्हा होति. ते निरागस हसू या रोजच्या धावपळीत कुठे दिसतच नव्हते . पण शांतपणे झोपलेल्या चेहऱ्यावर मात्र अगदी शोभून दिसतंय ते हसु. माझ्यावर अगदी निस्वार्थी प्रेम करणारे कोणीतरी म्हणून मी या निरागस चेहऱ्याकडे पाहिले . आणि अगदी खरेच तो निस्वार्थीपणा स्पर्शातून , बोलण्यातून , वागण्यातून मी रोज अनुभवला. कोणीतरी आपले असणे म्हणजे नेमके काय याच अर्थ मला त्या स्पर्शानेच शिकवलेला .

मला न दुखावता प्रत्येक गोष्ट करण्याची धडपड आणि अगदी कसलीच तक्रार नाही .  माझ्या प्रत्येक तक्रारीला , रागावण्याला समजून  घेऊन  सॉरी  म्हणत कुशीत शिरणे , कुरवाळणे आणि माझे चुकल्यावर आत्ता झोपल्यावर  दिसतेय न अगदी तशीच शांत मुद्रा ठेवत मला समजावणे .  कुठून अवगत झाल्यात त्या कला ? प्रेमापोटी असतील तर मग मला का नाही अवगत त्या कला  ?मी किती गृहीत धरले त्या स्पर्शाला , त्या आपलेपणाला .. याची जाणीव आज पहिल्यांदाच झाली . एवढी शांत मुद्रा नेहमीच असते पण मला ती आजच जाणवली.

किती नाती असतात आपलि. पण या नात्यात असे काय असते ? न रक्ताचे नाते असते न जन्मापासून नाळ जोडलेली असते. पण आपलेपणा , माया मात्र अगदी अनोखी.  कुठेतरी आतून कौतुक , कुठे व्यक्त होणारे कौतुक , कुठे  माया,कुठे नजरेतूनच व्यक्त होणारे प्रेम, कधी हट्ट तर कधी रुसवा  , रुसवा गेला तर कधी कडाक्याचे भांडण . कधी एक टोक तर कधी दुसरे पण तरीही प्रत्येक टोकाला असलेले आपलेपण .

श्वास मंद चालू आहे , डोळे मिटलेले  , चेहऱ्यावर कसले हसू आहे कोणास ठावूक पण आहे एक गोंडस हसू . माझे बाळ .  निरागस , शांत , प्रेमळ आणि माझ्याही नकळत मला जपणारे माझे कोणीतरी . माझा नवरा .

सूर्या थोडा वेळ थांब .उजाडू नको देउस . पहाटेचे हे गोंडस रूप मला जरा अनुभवू दे.  उशीर होऊ देत आज . पण हे निरागसपण मला माझ्या डोळ्यात साठवून घेऊ देत.

आत्ता उठेल हा  आणि अगदी छोट्या बाळासारखा चहा बनेपर्यंत माझ्या अवती भवति फिरेल . आणि एकदा कप मिळाला कि त्याच्यातला नवरा ताजा होऊन जाइल आणि रोजच्या धावपळीत पुन्हा एकदा हे गोंडस निरागस हसू दिसेनासे होइल. 

कदाचित चुकलंच

तुझ्यामध्ये एकट्याने उभे राहण्याची ताकद नसताना हात दिला … कदाचित चुकलंच
 तुझ्यामध्ये आत्मविश्वास नसताना तो निर्माण होण्यासाठी धडपड केली … कदाचित चुकलंच
 तुला नाही माहिती म्हणून शिकवल्या काही गोष्टी … कदाचित चुकलंच
 वाटलंच नव्हते कधी कानामागून आली आणि तिखट झालीये ती मिरची एवढी झोंबेल
 वाटलंच नव्हते कधी मला माझी ओळख सिद्ध करायला लागेल .
 वाटलंच नव्हते कधी माझ्या पाठीशी उभा राहणारा प्रत्येक जण माझ्याकडे कामाचा हिशोब मागेल
 आता सिध्द करू स्वतःला कि प्रसिद्ध करू चुकांना .. ह्याचा विचार करतोय … कदाचित चुकलंच
 तुला सोडायला हवे होते आहे त्या परिस्थिती मध्ये
 तुला सांगायला हवे होते शोध तुझा मार्ग तूच
 आता उशीर झालाय , आणि माझा मार्ग एकला उरलाय
 मी वाट शोधतोय आणि उत्तर शोधतोय नेमके काय गडबडले ?
मदतीचा हात देणे चुकले कि आधार देणे चुकले
 आता तू गळ्यातला ताईत आहेस आणि मी सगळ्यात वाईट आहे
 हे चित्र बदलण्यासाठी मदत करणारा तिर्हाईत आहे
 उभा राहून दाखवेन मी , सिद्ध करेन स्वतःला अजूनही किंमत आहे
माझ्या एखाद दुसर्या मताला
 तेच मत वापरून येउन दाखवेन वर
 तुझ्यासोबत उभा होतो आता उभा राहून दाखवेन एकट्याच्या बळावर !!

Wednesday, May 8, 2013

यमुनोत्री

हे लिखाण माझे नाही .  हे माझ्या  ८०  वर्षीय आजोबांचे अनुभव आहेत . सगळ्यांनी जरूर वाचा आणि आपली मते लिहा . ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचे लेखन व्यर्थ नाही हे त्यांना सांगण्याचा एक प्रयत्न करणार अहे. 

भारत मातेच्या लाडके , संस्कृतीच्या हृदय स्वामिनी , कृष्णाच्या संगिनी 
तुझ्या पुळणीवर …  बासरीच्या धुनीवर राधेसह गवळणी आणि आजचे स्त्री मन  बेभान होते. 

त्या यमुने , तुला आज रांगताना पाहतो आहे. तुझे अवखळ बेभान धावणे..  
तुझ्या दोन सहेल्या आणि तु. 

या उसळत्या निनादाने , या खोल दरीचा शेवट गाठण्याची स्पर्धा … पण तू प्रथम होतीस आणि या पहाडाने ल्याला होता हिर्या मोत्यांचा हार . ते तुझे अनादी आणि अविनाशी बाल्य मी पाहतो आहे . 

बाळे -
तू या परिसराचे  सर्वार्थाने जीवन बनून गेलीस . हि सारी माणसे , घोडे , गाड्या , यात्री , शासन यांचे संगोपन करतेस . 

हा निसर्ग सुद्धा किती भारावून गेलाय . तुझ्या बाल रूपाचा वेध घेत ह्या हिमशिखरांच्या संगतीत अन्तः करणात  वेडावून गेलो. 
तुझ्या अबोध जीवनात देव देवतांनी तुझा आश्रय शोधला . तपस्व्यानी ध्यान  धारणा केली . 

आम्ही सुद्धा आनंद शोधतोय . 
पण आज या क्षणी रमवलेस गं 

Monday, January 7, 2013

माणुसकी

पहाटे पहाटे जाग आली म्हणून मी उठून गच्चीत गेले. सुंदर प्रकाश खेळ नुकताच सुरु झाला होता. पक्षी किलबिलाट करत आपापल्या उद्योगाला लागले होते . आमची किलबिलाट करण्याची वेळ व्हायची होती.

आणि हे काय ...वासुदेव ??? कोणत्या तरी मराठी सिनेमात पहिला होता अगदी तसा. शाळेत बडबड गीताच्या पुस्तकातल्या चित्रात असतो तोच. वासुदेव !!

चिपळ्या वाजवत तो किती सुंदर गीत गात होता. नवऱ्याला हाक मारायला वळले आणि तेवढ्यात एक नऊवारी साडी नेसलेली एक म्हातारी कुठून तरी चालत आली आणि तिने वासुदेवाला काहीतरी झोळीत घातले. ' हे अजूनही चालते ?? ' मला उगाच प्रश्न पडला. पुण्यासारख्या शहरात ह्या गोष्टींचे अस्तित्व जपले गेले आहे ? आणि मला ठावूक सुद्धा नाही ??

वासुदेवाने आपले गाणे चालू ठेवले आणि तो चालत चालत जरासा पुढे गेला. बंडू काका त्याच्या समोर नेहमीचे वेडे चाळे करत आले आणि वासुदेवाने कसल्याश्या पिशवीतून काहीतरी त्यांना दिले. आणि आपले घाणेरडे हात आपल्या अति घाणेरड्या सदऱ्याला पुसत ते काहीतरी खायला लागले. ' दिवस उजाडला नाही आणि हे वेडं खातंय काय ?? ' असा मला प्रश्न पडला आणि कुतूहल देखील जागे झाले. नेमके कशाची देवाण घेवाण झाली असेल ?? त्या दिवशी का कोण जाणे बंडू काका नावाचा प्राणी मला माझ्या अवती भवती दिसला तरी मी त्यांच्या कडे कुतूहलाने पाहत होते. ते तीच पिशवी मिरवत होते. आणि जरा जरा वेळाने काहीतरी काढून खात होते.

बंडू काका - आमच्या सोसायटीत फिरत असतात. कोणी म्हणते कि त्यांच्या मुलीने सगळी प्रोपर्टी काढून घेतली आणि त्यांना हाकलून दिले. कोणी काय नि कोणी काय. लहान मुले त्यांच्या अवताराकडे पाहून घाबरून जायचे. आणि आमचं कार्टे रडायला लागले कि " बंडू काका ssss याssss ... याला न्या " असे म्हणायचं अवकाश आवाज एकदम बंद व्हायचा.

बंडू काका हे एक गूढ होते आमच्यासाठी. ते कोण ? कुठून आले? वसुदेवाने त्यांना काय दिले ? का दिले ? असे कितीतरी प्रश्न मनात रुंजी घालत होते . त्यांच्या हातातल्या पिशवीत काय असेल हे कुतुहल  जागे होते मनात ! दुसर्या दिवशी पहाटे  वासुदेवाच्या गाण्याचा आवाज येताच मी बाहेर जाऊन उभी राहिले आणि काल सारखाच प्रकार पुन्हा घडला. 

मी सुद्धा एका परातीत तांदूळ घेऊन वासुदेवाच्या पुढ्यात जाऊन उभी राहिले .  आणि मग तांदुळाने वासुदेवाची झोळी भरल्यावर न राहवून मी विचारले. काय देता तुम्ही बंडू काकांना ? वासुदेव गोड हसला. त्याच्या डोक्यावरच्या त्या मोर पिसांकडे  पाहून मला क्षणभर उगाचच खर्याखुर्या वासुदेवाचा  भास झाला. 


तो म्हणाला " ताई  ह्ये आमचे मालक हायती . अहो ह्यांच्यासाठी सकाळी हे वासुदेवाचे कपडे घालून येतो मी . मालक लई दिलदार . पण त्यांच्या पोरीने त्यांचे सगळे काढून घेतले आणि जावयाने डोक्यात हाणून त्यांना हाकलून दिले . त्या दिसापासून हे असा उघडे फिरत्यात. आम्ही हातावर पोट असलेली माणस पण साहेबांनी कधी काही कमी न्हाई केले. पण आम्ही काय देणार यांना ? मग रोज झोळीत पडेल ते बायको सकाळी  शिजवून देते . मी मालकांना आणून देतो आणि दिवसभर ते तेच खातात. अहो हे कोण हसणारे ? साले सगळे कर्ज म्हणून पैसे नेणारे लोक त्यांना आता दगड हन्त्यात. जीवाचे पानी  पानी  होतंय ताई . पन  त्यांना ठेवून घेतले तर आमची नोकरी जायची म्हणून हे मार्ग . लोक श्रद्धेपोटी द्येतात काही बाही. मालकांचे हाल पाहवत नाहीत ताई . देव देतो आणि  काढून पण घेतो .पण ताई उपकाराला जागावे आणि देवाकडे साहेबांचे औक्ष मागावे हे आता आमचे काम आहे. "

त्यांची मुलगी कोण हे समजल्यावर खूप धक्का बसला . वडील गेले म्हणून न चुकता त्यांचे श्राद्ध  घालणारी एक परिचित  बंडू काकांची त्यांना हाकलून  देणारी  मुलगी  आहे हा धक्का पचवणे  कठीण होते. 

बोलता बोलता डोळ्यात पाणी दाटून आले .मी वासुदेवाच्या रुपात खरा खुरा देव पाहिलेला त्याला नकळत हात  जोडले . वासुदेव गेला . त्याची आकृती धुसर झाली .

वास्तव हे कल्पनेच्या पलीकडचे असते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आज घेत होते. हि पहाट  माझ्यातल्या मला जागे करून गेली. बंडू काकांबद्दल असलेले कुतूहल संपले आणि मागे उरली एक जाणीव.... माणुसकी  मनापासून जगण्याची जाणीव  !! 


Friday, November 16, 2012

अंतर




एका अनोळखी वाटेवरून तू आणि मी चालत होतो. हातात हात कधी गुंफले गेले .. कळालेच नाही .आपण बोटांशी खेळता खेळता एकमेकांच्या कवेत हरवून गेलो .काय होते ते ? तो आवेग , तो स्पर्श , तो तू आणि ती मी !! चिंब भिजत राहावे अशी एक सर . ती सर बरसून गेली...आणि मग जी आली तिला शुद्ध म्हणतात कदाचित !! शुद्धीवर आल्यावर तू आणि मी दोन अनोळखी बेटांवर होतो. एकमेकांकडे ' आपण काय केले ? ' अशा अविर्भावात पाहत उभे राहिलेले आपण दोघे !! चूक कि बरोबर ठावूक नाही , पण कसल्याशा जाणीवेतून आपल्यातले अंतर वाढले .

तू माझ्या नजरेसमोर असताना अचानक तुझ्या माझ्यातले अंतर केव्हा वाढले मला उमगलेच नाही . तू दूर दूर जात राहिलास . आणि आता .. आता आठवणींमध्ये एका ठिपक्याएवढा दिसतोस . मी एकटीच आहे या बेटावर ... तुझ्या एका कटाक्षासाठी , तुझ्या स्पर्शासाठी आसुसलेली ... लाटा आदळतात विचारांच्या आणि त्यांचे तुषार झेलत मी एकटीच उभी आहे ... तुझी वाट पाहत ......कित्येक वर्षे सरली. तुझे असणे सवयीचे होते कि तुझे नसणे हि सवय आहे हे न जाणवण्याइतकी  वर्षे सरली तो आवेग अनुभवून 


मधल्या काळात  तुझे पत्र,मग इ मेल  तुझी खुण म्हणून  मागे उरलेली आपली मुलगी ह्यांनी  त्या आवेगाची आठवण  ताजी ठेवली. आणि त्या बातमीने मला मुळासकट हलवून टाकले. तू कधीच परत येणार नाहीस असे नाही वाटले . पण तू कधी येणार हे मात्र निश्चित नव्हते. आज तू येणार ह्या बातमीने मी खुश झालेय. खरच खुश झालेय का मी ? कि हा आनंद सुद्धा नुसतीच कल्पना आहे हेच समजत नाहीये मला.

माझ्या मुलीने नकळत्या वयात पाहिलेले तिचे वडील आज ४ वर्षांनी तिला  कवेत घ्यायला भारतात येणार हि बातमी तिला सांगून तिच्या डोळ्यात पाहिलेल्या आनंदाने मला जाणीव करून दिली आहे तुझे असणे आमच्यासाठी काय आहे याची .  वडील काय असतात हेच नाही अनुभवलंय तिने अजून . वडील म्हणजे परदेशात असलेला एक सांता  जो दर वर्षी न चुकता भरपूर कपडे आणि खाऊ पाठवतो एवढीच समज आहे तिला . तो खाऊ ते कपडे पाठवणारा सांता  तिची आईच आहे हे कधी कळलेच नाही तिला.

आणि मी . माझ्यासाठी तू कोण आहेस ?  ज्याने मला माझ्यातल्या  सौंदर्याची  जाणीव करून दिली. ज्याने मला स्त्रीत्वाचा अनुभव दिला. ज्याने मला माझ्यातले मी पण , माझे स्वातंत्र्य जपण्याची जाणीव करून दिली तो तू. माझे अस्तित्व बनलेला तू आणि  एक दिवस माझे अस्तित्व मुळासकट हलवणारा सुद्धा तूच. 

"अन्विता " ...तुझी  हाक ??? तू  आलास? तू मला हाक मारलीस ?  हो तूच ... माझ्या आठवणीतल्या ठीपक्याच्या रुपात मी जपलेला तू.. आज माझ्यासमोर आला आहेस . आणि माझे शब्दच हरवलेत. डोळ्यातून ओघळणारे अश्रू आहेत कि  माझे विचार ? तू परत  आलास ह्याच्यावर माझा विश्वासच नाही बसत आहे.

तिकडे जाऊन तू केलेले लग्न. तू माझी केलेली फसवणूक . आणि तुझे परत येणे .. खरे काय समजावे ? तुझे माझ्यावरचे  प्रेम  कि परिस्थितीने केलेला खेळ ? मधल्या काळात तू तुझ्या बायकोपासून लपवून मला पाठवलेले मेल हि तिची सुद्धा फसवणूकच होती. तिच्या गोऱ्या  समाजाइतके मोकळे आणि मोठे मन नाही माझे... पण आज माझे मन तुझ्याकडे का धाव घेत आहे हे नाही समजत आहे मला . असे काय बंधन आहे आपल्यामध्ये ज्याने तुला आणि मला असे बांधून ठेवले आहे ?

तू अगदी तसाच दिसतोस अजूनही.... नकळत माझ्या केसांकडे माझा हात गेला आणि उगाचच आपण गबाळे  दिसतोय कि काय असा वाटून गेले.


तू समोर आहेस.... मन तुझ्याकडे धाव घेत आहे . पण पावले ... पावलांना नाही जायचं तुझ्याजवळ ..आपण समोर येईपर्यंत  तुझ्याकडे  धावून येण्याची इच्छा करणारी माझी पावले आज तुझ्याजवळ नाही येत आहेत . मनाची अशी द्विधा स्थिती मी कधीच अनुभवली नव्हती ..असे का होतंय  ?? कदाचित आता उमगतंय कि आपल्याला बांधून ठेवणारे दुसरे कोणी नाही आपल्यातले अंतर होते. 

आपल्यामध्ये ते बंधन तू दूर असताना माझे वाटायचे. आणि आता कसलीच बंधने नाही आहेत पण तरीही मन चालतंय तुझ्या दिशेने आणि पावले अगदी विरुद्ध दिशेने. मनात आपल्या मुलीचा विचार आला आणि वाटले '  आपली ?  नाही ती माझी मुलगी आहे. तू काय दिलेस तिला ? जन्माआधी एक सावत्र आई  , जन्मानंतर सक्ख्या आईकडून सतत फसवणूक . तू माझी फसवणूक केलीस , तुझ्या बायकोची फसवणूक केलीस आणि ती गेल्यावर तू पुन्हा एकदा मला फसवायला परत आला आहेस? का ?  ' 

मनात असे विचारांचे वादळ का आहे ? मला काय हवे आहे तेच समजत नाहीये . " तू आलास ?? " माझ्याच नकळत मी काय बोलतेय हे ....?

 " तू का आलास ? निघून जा . मला आणि माझ्या मुलीला सोडून निघून जा.  आम्हाला तुझे अस्तित्व  मान्य  आहे पण कदाचित ते आमच्यापासून दूर कुठेतरी असताना  . तुझ्यावर माझी भाबडी माया आहे ती टिकून आहे त्याचे कारण आहे तुझ्या माझ्या मधले अंतर. ते कधीच कमी होऊ देऊ नकोस. आणि आम्हालाही अंतर देऊ नकोस . जा निघून जा . आम्हाला एकटे सोड " 

माझ्या आकान्ताकडे हताशपणे पाहणारा तू आणि मग आल्या पावली माघारी जाणारा तू ...अजूनही नजरेसमोर तसेच्या तसे आठवते. अजूनही मनापासून प्रेम आहे माझे तुझ्यावर.  पण तोपर्यंतच जोवर आपल्यात आपणच जपू तेच अंतर जे तू एके काळी मला दिलेस आणि जे मी अजूनही जपलय 







मिलन

विरहाचे उन रखरखले डोंगर माथ्यावरती
मिलनास आतुर झाले आकाश आणि धरती
सरसावून आपले बाहू बरसले जणू आकाश
अधीर धरती वेडी आतुरली त्या स्पर्शास
घन गर्द एका राती बरसला श्याम मेघ
आतुर धरती वेडावली पाहुनी तो आवेग
तृषार्त धरती झाली तृप्त त्या स्पर्शाने
ते दीर्घ चुंबन सजले अंगणात पावसाने