Tuesday, February 23, 2010

कंटाळा

" तुमच्या पुण्याच्या मुलांना काय रे सारखे बोर होते ? अमुक ढमुक नाही मला बोर झाले. उठला नाहीस कि बोर झाले "  माझा भाचा सुट्टीला आला कि हमखास कानावर पडणारे शब्द ! आणि  अगदीच कोणी नाही म्हणाले तर मी म्हणतेच हे वाक्य. शाळा असली कि मला शाळेत जायला बोर होते आणि सुट्टी असली आणि टी व्ही नाही पाहू दिला कि मग घरात बोर होते . सारखे आपले बोर होतंय याला.  हि आपली सहज प्रतिक्रिया आमची असते.

खरे पाहता आपण म्हणतो.... "  कंटाळा आला " . त्याचा बाप तोच आणि त्याची आई तीच .... आपण फक्त मराठीतून बोर होत असतो इतकेच काय ते !!! असे मला बोर झाले कि हमखास जाणवते.

कंटाळा ..... कोणी तरी खूप कंटाळा आल्यावरच या शब्दाचा शोध लावला असेल नाही ?  कशाला कंटाळला असेल हा शब्द बनवणारा माणूस ? शेतीला ? शब्द्नाचा शोध लावायला ? कि ... बोलायला ?? कि कंटाळ्यालाच ???

मजेशीर आहे हा शब्द आणि आपण तो अगदी सहज वापरतो. "कंटाळ्याचा कंटाळा आलाय  मला  " अशी कोटी पण घरात बऱ्याचदा होते. माझ्या भाच्याच्या बाबतीत  " तुझे बोर ऐकून मला बोर झाले आहे "  असे म्हणतोआम्ही .

थोडक्यात बोर होण्यासाठी actually   काही काही कारण नाही लागत. पण आपण विनाकारण बोर होतोय हे कसे स्वीकारायचे म्हणून आपण सहज म्हणतो " यार नुसते बसून कंटाळा आला आहे "

बरे तीच तीच तीच कृती पुन्हा पुन्हा होते म्हणून कंटाळा येतो असे म्हणालो तर तसेपण नाही . सहज म्हणून कायम घरात बसणाऱ्या बाई ला म्हणा पाहू " काकू चला आपण गावाला जाऊ ८ दिवस" ती उत्तर देते  " प्रवासाचा कंटाळा आला आहे . अगं मला, घरात बसावे वाटते आहे. " बरे तीच बाई तासाभरापूर्वी " घरात बसून कंटाळले आहे मी "  असे म्हणालेली असते.

तर एकंदर कंटाळा आणि माणूस यांचा संबंध तेव्हा  येतो जेव्हा  त्याला चालू कृतीपासून पळायचे  असते ...असा एक शोध आम्ही लावला . पण छे ... तसे पण काही नाही. कारण  " या पळपुटेपणाचा  आता खूप कंटाळा आला आहे " हे पण कानावर पडले आणि आमचा निष्कर्ष चुकीचा आहे हे समजले.

तोच तोच पणा , पळून जाणे , टाळणे , अशा कोणत्याही कृतीला कंटाळा चिकटू शकतो असे आम्हला समजले.

पण कंटाळ्याच्या  मुळाला शोधताना   कंटाळून कसे चालेल ?? boredom is desire of desires वाचले  आणि माझा शोध संपला. थोडक्यात स्वीच मारायचा असला कि माणसाला कंटाळा येतो. असे आम्ही निष्कर्ष काढून मोकळे झालो .

कंटाळा आला ?? कंटाळ्याबद्दल वाचून ???

चला तर कंटाळा येण्याचे अजून एक कारण मी माझ्या शोध निबंधात टाकते.

" कंटाळ्याबद्दल वाचून  सुद्द्धा प्रचंड कंटाळा येतो "

Wednesday, February 17, 2010

एका नवीन जगाची कल्पना

पण त्याच्यासोबत येणाऱ्या त्याच्या जगाचं काय?

त्याचे जग नवीन असेल. जिथे मला तो घेऊन जाईल. त्याच्या आणि माझ्या जगाशिवाय तिथे तिसरे जग असेल. पुढे मागे ते पण माझेच जग होईल पण ते माझे होईपर्यंत काय ?

तो असेलच.... पण आत्ता असतो तसा सावलीसारखा नसेल सोबत कायम . कुठेतरी बालवाडीत आईने बोट सोडले तसे तो पण मला या नवीन बालवाडीत बोट सोडून एकटीने पुढे जायला लावेल.

बालवाडीचे बरे असते. तेव्हा माझे तुझे समजत नसते. त्यामुळे बालवाडीच्या बाईंवर हळू हळू आईपेक्षा जास्त विश्वास बसायला लागतो.
उकार चुकलेला आईने दाखवला तरी बाईंनी असेच शिकवले आहे असे तोऱ्यात सांगता येते . आणि आई गप्प बसून आपले कौतुक पाहते. बाईंनी केलेली तक्रार पण लाडिक पणे बाबांना सांगते आणि मग ते दोघे गालातल्या गालात हसतात.

तो पाहणार का असे कौतुक ? मी चुकते आहे हे सांगताना आईने दाखवला तसा संयम असेल त्याचा ? तिथे बाईंनी तक्रार केली तर गालातल्या गालात हसेल ? कि माझ्यावरच रुसेल ?

मनात प्रश्न उभे राहतात जेव्हा वाटते आता माझे जग बदलणार आहे. एक नवीन बालवाडी , प्रत्येक पायरीवर एक परीक्षा आणि मग बालवाडीतून पहिली , दुसरी करत करत मी आईचे बोट सोडून खूप पुढे निघून जाईन.

तो असेलच. बालवाडी पेक्षा जर्रासे मोठे झालेले माझे मन सांभाळायला तो कुठेतरी असेलच. पण त्याच्यासोबत असलेल्या जगाचे काय ?

त्याच्यासाठी पण एक जग असेल. जे आत्ता माझे आहे ते पुढे त्याचे पण जग बनेल. पण थकल्यावर गोड स्वप्न पडावे तसे थोड्याच वेळापुरते ते जग त्याचे असेल. तिथे त्याचा अस्तित्वाला मान असेल . तिथे त्याला थकण्याची संधी कमी असेल आणि आराम भरपूर असेल. तिथे त्याने काही नवीन शिकावे असा अट्टाहास करणारी मीच असेन फक्त. पण तो काही चुकला तरी त्याची चूक मोजलीच जाईल असे नसेल. त्याचे जग chocolate च्या बंगल्यासारखे असेल . सुंदर , मोहक , जिथे मला पण जावेसे वाटेल पुन्हा पुन्हा . कारण तिथेच तर माझे एक जग होते याची जाणीव होत राहील पुन्हा पुन्हा.

पण त्याच्या सोबत असण्याचे खरे सुख या नवीन जगातच असेल नं ? कितीही वाटले तरी पुन्हा पुन्हा माझी नजर जाईल त्याच्या पानाकडे जेव्हा तो खात असेल त्याची नावडती भाजी आणि फक्त माझ्या अट्टाहासासाठी तो ती निमुटपणे खाईल. ठावूक आहे मला कि तो ते सगळे करेल ज्याने मी खुश राहीन. इतकी कि आठवणींचा एक कप्पा सुद्धा त्याच्या प्रेमाने भरून टाकेल तो आणि मला या माझ्या वाटणाऱ्या जगाची आठवण पण नाही येऊ देणार.

त्याला जाणवेल का माझे अवती भवती असणे ? उगाच भीती वाटते. तो पाहत असेल का माझी उगाच होणारी पळापळ ? कोणीतरी परके येऊन फुंकर घालेल मला एकटीला पाहून तेव्हा तो असेल का तिथे माझी नव्याने फुलणारी मैत्री पाहायला ? कि त्यानेच पाठवले असेल या नवीन सोबतीला ?माझी नजर भिरभिरत राहील त्याला शोधायला. पाहत असेल का तो मला दुरून ? बावरलेली माझी नजर समजेल का त्याला ?

नवीन जग , नवीन लोक..  मैत्री तर होईल माझी. तो असेलच.... फक्त सावलीसारखा नसेल. त्याचे अस्तित्व मला जाणवेल आणि माझ्या अस्तित्वाची त्याला फिकीर असेल. ते जपत तो पण मला या नवीन बालवाडीत रूळवेल  . मी बनेन त्याची आणि या जगातल्या सगळ्यांची .अशीच वाढेल माझी मैत्री. त्याच्या प्रेमात , त्याच्या उपस्थित आणि अनुपस्थित.

माझे नवीन आयुष्य असेच बनवायचे आहे नं मला ? त्याचे , माझे , आमचे ?? त्याच्या आनंदात माझे जग बनेल , ते फुलेल अगदी तसेच जशी आमची मैत्री फुलली , प्रेम वाढले आणि आता आमचे जग नव्याने उभे राहील.

- ती

ती नवीन जग घेऊन येईल , त्याचे काय ?

ती आता इथे नवीन जग बनवेल. तिच्या कल्पनांचे , तिच्या आवडीच्या गोष्टीनी सजलेले. कॉलेज मध्ये रंगमंच सजवायची तेव्हा सगळी कल्पकता तिचीच तर असायची. पण मला सगळे आवडायचे . अगदी काळा पडदा आणि पांढरे दार पण तिने बनवले आहे याचे कौतुक असायचे. तेच कौतुक इथे होईल सगळ्यांकडून यात शंका नाही. तिच्या असण्याच्या गन्धापेक्षा मोठे सुख काहीच नाही आहे हे नक्की.

पण रंगमंच मोकळा असायचा. आणि इथे एक जग आहे. ते माझे आहे, ती ते सगळेच बदलून टाकेल ? कि याच जगाचा एक भाग बनून जाईल. नाही ...पण तसे झाले तर तिच्या कल्पनांचे काय ? आणि तसे नाही झाले तर हे आहे या जगाचे काय ?

तिच्यासोबातचे जग ती सोडून येईल . सुट्टीच्या दिवसात ते माझे जग असेल. पण मग लहानपणी मी मजा अनुभवली तशी सुट्टी असेल ? नकळत वागण्यावर बंधने आलेली असतील. आणि ती मी शहाण्या मुलासारखी पाळतोय पाहून लहानपणी बाबांच्या शिक्षेला मुकाट सहन करणाऱ्या मला नावडती भाजी खाताना पाहून नकळत डोळे भरायचे आईचे तसे तिचे पण डोळे भरून येतील ? तिच्या जगात असताना ती घेईल का माझी काळजी ? कि हरवून जाईल त्या सुखात जे सोडून कायमची आलेली असेल ती माझ्यासोबत ?

पण ती देखील पाळेल या नवीन शाळेतली शिस्त . तेव्हा तिचा मीच असेन इथे . फक्त मी !! बाकी सगळे अनोळखी जगातले तिचे नवीन सोबती. त्यांची आणि तिची मैत्री होईलच. पण तोवर तिला जाणवणारी पोकळी मी भरू शकेन ? कितीही सोबत असली तरी मनात एक मोकळी जागा असेल तिची... तिच्या आठवणींसाठी. कधी भरू शकेन का मी ती माझ्या प्रेमाने ?

पळत राहील कायम. कॉलेजात पण तेच करायची. पाहीन मी तिला . आणि मग तिच्या दमलेल्या चेहऱ्याला गर्दीत मी नाही दिसलो कि जी छटा येईल. ती पाहण्यासाठी मी पण दुर्लक्ष करेन आणि मग हळूच कोणाला तरी पाठवेन तिच्याशी नव्याने मैत्री करायला. तिची भिरभिरती नजर कळेल मला . पण मी दूर असेन तेव्हाच तर तिला माझ्यासभोवतीच्या जगात कोणी तरी तिचे आपले वाटेल . दुरून काळजी घेईनच मी तिची .

ती करेलच मैत्री . मला विश्वास आहे. असेच बनवेल नं ती आमचे जग ? अगदी सुंदर. कॉलेज च्या स्पर्धांमध्ये stage बनवले अगदी तितकेच ...किंबहुना त्यापेक्षा सुंदर असेल माझ्या आयुष्याचा रंगमंच .....सुंदर आणि कल्पनेपेक्षाही  वेगळा


- तो

Friday, February 5, 2010

Signing the offer letter

We three girls were selected to join the new company. Yes it was a start up when we joined . we were asked to come to the company to sign the offer letter.

I do not recall date when we came to sign the letter. But yes we went to company at about 1 pm.

We climbed up stairs. and when we reached the third floor. we saw there were few people having lunch together. Yes Angel too was there and there I came to know he is CEO of the company.

He gave a smile to us. We entered from another hall. Where there was a small office setup. Akash ( he was one of the two devils who conducted interview and later I found him jolly man ) came in the hall and managed three chairs there. There was a small glass table. He cleaned that with a duster and kept three papers before us. and asked to sign.

I always make mistakes and here too I made mistake. I signed on the place where there was a space to write joining date and I wrote joining date incorrect.

Then the way I was  making faces conveyed Swati that I have gone wrong some where. She laughed at me. Reacted in her typical way. And then we submitted the papers to Akash.

We came back with a joy on our face that now we too will be joining the Comapny. I found it nice. Swati and me were two sharing joy.

Father of third girl asked about the company and we answered " Kaka ithe CEO pan saglyansobat jevayla bastat "  We were happy that we were not dragged in a formal life where we would have never survived.


Now it was time to enjoy with college mates and have fun till we get apart.

We were waiting for 1st Jan 2009 - which we signed as an official joining date on the paper.

Tuesday, February 2, 2010

सहज वाचले आणि खूप आवडले .....



मिलिंद फणसे यांची हि कविता सहज नजरेला पडली आणि खूप आवडली म्हणून या ब्लॉग चा एक भाग बनत आहे हि कविता......

शापित

सूर्य राहूशी मिळाला, कृष्णपक्षी चंद्र झाला
दीपही प्रत्येक विझला, ठेवला ज्यावर हवाला

तामसांचे राज्य उलथू पाहतो नाठाळ तारा
कृष्णविवरा घाल वेढा बंडखोरांच्या नभाला

दाटते डोळ्यांत काळी संभ्रमांची मेघमाला
मांदियाळी आसवांची छेद देते काजळाला

गस्त घाली भोवताली भुंकणाऱ्यांची शिबंदी
वास मृगयेचा अशाने येत आहे संगराला

जन्म घेती आजही ती देवकीची सात पोरं
तीच आहे कंससत्ता, तीच आहे बंदिशाला

प्राशिले तू नीळकंठा एकदा केवळ हलाहल
रोजचे मंथन अम्हाला, वासुकीचा रोज प्याला

माणसांनी पेटण्याचे दिवस ते सरले कधीचे
गूल शब्दांचे निरर्थक घासणे आता कशाला

का चिरंजीवित्व भृंगा कांक्षिता आशीर्वचांने
काय महती अमृताची जीविताच्या शापिताला

Monday, February 1, 2010

गोष्ट एका चिऊताई ची

आटपाट नगर होते .  नगरात मुसळधार पाऊस आला . पावसात चिऊ ताई  उडत होती.  पंख भिजून चिंब झाले होते. आणि फडफड सुद्धा करता येत नव्हती . कोणी कोणी दार उघडायला तयार नव्हते . म्हणे आज काल जमाना खराब आला आहे.

चिऊ चे स्वगत .....

शी  आजच या मोबाईल ची हि अवस्था व्हायची होती. या माणसांच्या towers  पेक्षा जास्त height नको का आमच्या towers ची ?  at least Aeroplane  mode  तरी पाहिजे होता या मोबाईलला . जाम वैताग  आहे . उडताना नेमकी range जाते .

     हम्म शेजारच्या कावळे काकुना सांगितले कि  घरी पोहोचलात कि आई ला निरोप द्या तर म्हणतात कशा "आमची तुमची खानदानी दुष्मनी आहे . दार उघड म्हणाले मामंजी तर तुझ्या आजी ने थांब माझ्या बाळाचे अमुक....... तमुक...... करत दार नाही उघडले बराच वेळ . आणि  मोबाईल आहे ना तर वापर कि " आता हा वरचा टोमणा कशाला ?  त्यांच्या मामन्जीना शहाणपणा नव्हता  ?  शेणाचे घर कशाला बनवायचे ?  आणि या जाऊन बोलल्या आईशी तर आई काही दार नाही उघडणार का ? नाटके उगाच ? कधी संपणार हि भांडणे. माणसातल्या हिंदू मुस्लीमांसारखे आमचे झालंय . वर्षानुवर्षे तीच भांडणे. कंटाळा आला आहे.

बरे आश्रयाला एक झाड नाही आहे इथे आणि कोणत्याही जागी थांबता नाही येत आहे. जरा खिडकीवर बसावे म्हणाले तर " भुर्रर " करून उडवून लावतात मला. आमच्याच जातीतले चिमण मंडळ समाजातले पण कोणी दार नाही उघडत आहे.

हि माणसे पण ना  !!!  रोज एक झाड पाडतात . आणि यांच्या flat  मध्ये आम्ही घरटे नाही बांधायचे. लोकसंख्येमुळे यांच्या नगरपालिकांच्या महापालिका झाल्या  आणि आमचे मात्र बरोब्बर उलटे चित्र !!! परवा पंख्यात अडकून मोठ्या चिमणे काकू गेल्या.  आणि त्यांच्या पेपरात मात्र लेख !! तर काय म्हणे चिमण्या हरवल्या आहेत . यांनी आम्हाला हरवून टाकले आहे या सिमेंट च्या जंगलात .  आजी च्या लग्नाचे फोटो पहिले तर त्यात कित्ती सुंदर दिसत होती ती. झाडांमध्ये फिरायला गेले होते म्हणे ती आणि आजोबा . आणि हा चिमणा मला विचारतो  "कुठे नेऊ तुला ? CCD  च्या छतावर जाऊ "  शी मला बाई तिथे सिगारेट चा धूर सहन होत नाही. जीव घुसमटतो. आणि CCD  च्या छतावर नीट बसता पण नाही  येत .

पूर्वी थेटरात जाऊन बसता तरी यायचे हल्ली हे A .C . असलेले multiplex  आत पण जाऊ देत नाहीत . त्यामुळे रोमांटीक सिनेमा पाहायला पण नाही नेत चिमणा मला हल्ली.

हे काय ?? खाली कित्ती पाणी साठले आहे !!! गाड्या पहा !!! रांगेत एकामागे एक अडकून पडल्यात. माणसांचे पण मोबाईल बंद पडलेत वाटते.  आज काय बरे तारीख ??? २६ जुलै !!!  उद्या आई च्या लग्नाचा वाढदिवस. आई सांगते तिचे लग्न भर पावसाळ्यात पण झाडांमुळे थाटात झाले होते.  मंडप पण छान होता फांद्यांचा. 

शी बाई पुरे हे एकटे बडबडणे . रात्र झाली. अंधारात धड दिसत नाही आहे.  

पूर्ण रात्र आटपाट नगरात पावसाने हाहाकार  माजवला होता. चिऊ ताई भुकेजली होती. गाड्या अडकून पडल्या होत्या. लोकांची लगबग चालू होती. सगळे पळापळ करत होते पण काही काही होत नव्हते. प्लास्टिक च्या कचऱ्यामुळे पाणी तुंबले होते. माणसाच्या चुकांमुळे चिऊ ताईला शिक्षा झाली होती. 

ती कायमच होत आली होती. चिऊ ताईचे  कित्तीतरी नातेवाईक माणसांच्या मुळे आपले घर गमावून बसली होती. आता तर त्यांच्या जमातीत तिला शहरातली स्थळे पण मिळत नव्हती . कारण शहरातल्या चिमण्या हरवल्या होत्या. शिक्षण झालेली चिऊ ताई खेड्यातल्या चिमण्याला होकार  देऊ शकत  नव्हती. आणि शहरातला चिमणा तिला हवे तसे  मोठे मेणाचे ...झाडाच्या  फांद्यांमधून सूर्याच्या हलक्या प्रकाशात न्हाऊन निघणारे घरटे देऊ शकत नव्हता. शहरात साधा  flat मिळणे कठीण होते.

दिवस उजाडला. चिऊ  ताई घरी नाही आली त्यामुळे चिमणकर मंडळी घाबरली होती . इतक्यात TV  चा  आवाज आला . पुरामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती आणि बातमीतून हिंदू मुस्लीम एकत्र येऊन... भांडणे विसरून.... एकमेकाला मदत करत आहेत पुन्हा पुन्हा हे सांगितले जात होते.

इतक्यात दार वाजले. बेशुद्ध चिऊ ताई ला घेऊन कावळे काकू आणि काका आले होते. " घ्या तुमचे बाळ... तिकडे बेशुद्ध होऊन पडलेले.... थंडी ने काकडली आहे. गरम काहीतरी घालायला द्या.  आम्ही निघतो "  कावळे काका बोलले.

" आत या ना  . काहीतरी घ्या. "  चिमणकर काका म्हणाले.

पावसात  चिऊताई च्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडलेली. खानदानी दुष्मनी जराशी तरी कमी झाली होती . 

तेच माणसांमध्ये पण घडले होते. एका पावसाने सगळ्या भिंती पाडून टाकल्या.

भेदाच्या भिंती भेदल्या होत्या एकाच विजेतून!!!  जी कडाडली.......... आणि प्रेम बरसले.