Thursday, August 30, 2012

दत्तू

पहाटे पहाटे दार ठोठावत दत्तू ओरडत होता " शकू ताई ...... शकू ताई "  . दत्तू चे सकाळी सकाळी असं कापर्या आवाजात ओरडणे मला घाबरवून टाकणारे होते. दार उघडल्यावर कसलाच विचार न करता त्याने मला मिठी मारली . त्याचा कपड्यांना रक्त लागलेले. त्याची हाफ चड्डी भिजलेली होती.

" काय रे दत्तू ? काय झाले  ?? " " घरला पोलीस आलेत शकू ताई . बाबाचे डोके आणलंय !! चेंदा मेंदा झालाय  !! " 

वय वर्षे १० .......दत्तात्रय सखाराम पोटे आमच्या दारात उभे राहून रडत होता. त्याला भीतीने कापरे भरलेले. आणि डोळ्यातून पाणी... !!

सखाराम काका ?? पण इतक्या पहाटे ??

सखाराम काका अपघातात गेला होता . मागे दत्तूला एकटा टाकून !!

दत्तूची आई कोणाचा तरी हात धरून पळून गेलेली. दत्तू ३ महिन्याचा असतानाच !! सखाराम काका देव माणूस !!  गळ्यातले स्वामी समर्थ आणि हातातली साई बाबाची अंगठी या दोन गोष्टींवरून त्याचे धड लोकांनी ओळखलेले. आणि मग रेल्वे रुळावर त्याचे डोके सापडले. अगदीच चेंदा मेंदा झालेला डोक्याचा !!

दत्तू ची कापरे भरलेली प्रतिमा अजूनही मला तशीच आठवते. सगळे सोपस्कार पार पडून सखाराम काकाचे निष्प्राण शरीर चाळीत आणलेले. पोलिसांनी!! शेजारच्या कोणी काकू नि ते धड सखाराम काकाचेच आहे असे ओळखले. आणि मग दत्तू धावत सुटला ते थेट माझ्या दारात येऊन थांबला. दरम्यान भीतीने त्याचे कपडे ओले झालेले !!

" उद्यापासून आमच्याकडे पण पेपर टाकत जा " या वाक्याने आमच्या नात्याला सुरुवात झालेली आणि मग अहो पेपर वाले पासून ए सखाराम काकापर्यंत ते नाते बदलत गेले . कधी आणि कसे समजलेच नाही .

मी नवीन लग्न होऊन आले तेव्हा सखाराम काका भाजी आणण्यापासून सगळे करून बदल्यात एक कप चहा घ्यायचा आणि मग  पुढे....  " शकू ताई  आमच्या दत्तू ला पण तुझ्या गौरव सोबत शिकवत जा !! पोराला माय टाकून गेली ग !! तुलाच शकू ताई शकू ताई करून जीव लावतो !!  " अशा गप्पापर्यंत सगळेच खूप छान !!  वयाने माझ्या एवढाच असलेला माणूस पण मी त्याला सखाराम काका म्हणायचे.  आमच्या गौरव ने सुरुवात केलेली या नावाने त्याला हाक मारायला !!  

दत्तूला मी मिठीत घेतले . हे आणि मी त्याला घेऊन शेजारच्या चाळीत गेलो. तिथे लोक गोळा झालेले !! आणि मधोमध सखाराम काकाचे तुकडे जोडलेले कलेवर पडलेले . दत्तू भीतीने काळा निळा पडलेला . मी त्याला पाणी पाजले आणि मग त्याची शुद्ध हरपली . दत्तू पुढचे ८ तास शुद्धीवर आला नाही !!

सखाराम काकाची बायको मी त्या दिवशी पहिल्यांदाच पाहिली. तिने भपकेबाज कपडे घातलेले . आणि तितकेच भडक कपडे घातलेला एक माणूस आला होता तिच्या सोबत !! "  देवाकडे गेला देव मानूस तुमचा "  असे म्हणून तिने चार टिपे गाळली आणि प्रत्येक अश्रू गळताना ती शेजारच्या माणसाला आणखीनच घट्ट मिठी मारत होती. अंत्ययात्रा निघे पर्यंत थांबायची सुद्धा तसदी न घेता त्या बाईने काढता पाय घेतला. आणि जाताना दत्तू कुठे आहे.. कसा आहे .. या बद्दल चकार शब्दही काढणे टाळून ती आली तशी निघून गेली . हे सगळे अनपेक्षित होते मला. पण चाळीतल्या लोकांना हे सगळे जणू सवयीचे होते. त्या बाई चे येणे आणि जाणे यावर आश्चर्य करणारे माझ्याशिवाय तिथे कोणीच नव्हते !' सखाराम काका गेल्यावर दत्तुचे पुढे काय ? ' हा प्रश्न त्याच्या जन्मदात्रीला खरच पडला नसेल का ?  पण तिच्या वागण्यातून काहीच जाणवले नाही .

सखाराम काकाचा अंत्यविधी पार पडला. दिवस घालायला पुढाकार घेऊन त्याच्या घरातले कोणीच आले नाही. दत्तूने माझ्याकडून थोडे पैसे नेऊन दिवस घातले... आणि मग एक दिवस अचानक ते पैसे परत केले. " शकू ताई ..झोपडी विकली  त्याचे २०००० मिळाले . हे तुझे पैसे " असं म्हणत माझ्या हातात पैसे टेकवून दत्तू पाणावल्या डोळ्यांनी गेला. 

बरीच वर्षे झाली या गोष्टीला... दत्तू कुठे गेला , काय करतो , पुढे त्याच्या आईचे काय झाले, त्याने त्या २०००० चे काय केले, शिकला कि नाही असे खूप प्रश्न पडत राहिले . एखादा मळक्या कपड्यातला साधा मुलगा दिसला कि दत्तुचा भास होतो. दत्तू तसाच राहिला असेल कि  हातात सोनेरी घड्याळ . कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट आणि पांढरी  विजार आणि बूट घातलेला  एखादा गुंड झाला असेल . मी केलेल्या थोडक्या संस्कारांना विसरला असेल का... असे अनेक  प्रश्न सतत पडत राहिले. कुठेतरी देवा दत्तू चांगल्या मार्गाला लागला असू देत , त्याचे सगळे चांगले होऊ देत असे विचार येत ....देवापुढे मनातून अनेकदा  हात जोडले जायचे 

पण आज सकाळच्या पेपरातली आदर्श शिक्षकाची बातमी आणि त्यात आलेले नाव 'दत्तात्रय सखाराम पोटे 'या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन गेले. दत्तू आता आदरणीय दत्तात्रय सर झालेला आहे हे पाहून मन सुखावले. आणि मनात कुठेतरी असलेले विचारांचे वादळ शमले. दत्तूने माझे थोडके संस्कार सार्थकी लावले. 

पावसा कधी येशील ?

ग्रीष्मातल्या एखाद्या रटाळ  दुपारीनंतर  ढगांची  मैफल  जमावी  , गडगड आवाजाने  ताल  धरावा  , विजेचे  नृत्य   व्हावे   आणि  सरींची  मैफल  जमावी … अशा  वेळी  अवघ्या  सृष्टीने  त्या  सुरांमध्ये   तल्लीन  होऊन  हरवून  जावे  असा  एक  दिवस  घेऊन  येतो  श्रावण … मैफिलीचे   पडसाद   उमटतात   अवघ्या  सृष्टीत   … सरी   कोसळताना  होणारा  रव   जणू  टाळ्यांचा  कडकडाट  करत  असतो  …आणि  मग  … प्रसन्नतेचे  नवीन  रुपडे  लेवून   धरणी  प्रतिसाद  देते  पावसाच्या  मैफिलीला  आणि  नकळत  ओठांमधून  शब्द   उमटतात  वाह   ..या  मैफिलीला  भैरवी  नको ..यंदा हि मैफल जमतच नाहीये ... पावसा कधी येशील ? 

तुझ्यासाठी ...

तू आयुष्यात आलास.... असा ...जसे घोंगावत वादळ यावे . आणि मग त्या वादळाने मागे आपल्या खुणा ठेवाव्यात ! अस्ताव्यस्त , सैरभैर झालेल्या गोष्टींनी आठवण करून द्यावी त्या वादळाची ...मग त्या वादळाच्या तडाख्यात आलेल्या वस्तूंच्या अस्तित्वाच्या फक्त खुणा राहाव्यात . आणि मग नवीन आयुष्याची सुरुवात व्हावी !!

अगदी तसाच आलास माझ्या आयुष्यात !! सैरभैर झालेले माझे मन माझ्याच अस्तित्वाच्या खुणा शोधत राहिले !! पण माझे अस्तित्व मी म्हणून संपून गेले होते !! तूच भरून राहिला आहेस  !! मनात ....श्वासात .... आणि  माझ्यातल्या अणु रेणू मध्ये !! आणि हे वादळ माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात घेऊन आले आहे हि एक हळुवार जाणीव मनाला स्पर्शून गेली !!
आता आपल्या आयुष्यात जी वादळे येतील ती आपली असतील ...तुझी आणि माझी ....

 नवीन आयुष्यात प्रवेश करताना मी हळुवारपणे  माझ्या आठवणींचा शिंपला उघडून पहिला आणि मला मोत्यांची रास मिळाली ....

आपल्या आयुष्याच्या वादळांमध्ये  त्या आठवणी धूसर होण्याआधी  त्यांचा नजराणा .... माझ्या आयुष्यातल्या वादळा...