Wednesday, September 15, 2010

आमचे ऑटोमेटेड लग्न

हा लेख हि आमच्या अति तंत्रज्ञ बुद्धीतून जन्माला आलेल्या कल्पना आहेत !!

आम्ही सगळेच कॉम्पुटर चे विद्यार्थी !! एखाद्या लग्नाला जाऊन आलो कि हे असे केले तर किती मजा येईल अशी चर्चा व्हायची !! माझे लग्न ठरले तेव्हा पण अशा किती तरी अभिनव कल्पनांचा उगम झाला !! त्याच इथे लिहित आहे !!

१. कन्व्हेयर बेल्ट वरून आशीर्वाद द्यायला आलेले लोक  -

लग्नात सगळ्यात जास्त कोण दमते.. तर वधू आणि वर !! वर खाली करूनच त्यांची वाट लागते !! त्यात भरीस भर मुलगी सांगते " या कि नै आमच्या काकुच्या काकू  हम्म !! "  (याचा गर्भित अर्थ  " पाया पडा "  असा असतो ) आणि मग वाका !! पुन्हा नवीन काकू येईपर्यंत वाकून राहता येत नाही म्हणून काकू येई पर्यंत वर या !! वाका वाका ( शकीराचे नाही हो !! ) मध्ये कंबर " मला जाऊ द्या न घरी आता वाजले कि बारा " असे ओरडून सांगायला लागते !! म्हणून आमच्या एका मैत्रिणीने सुचवलेला उपाय  !!

लग्नात कन्व्हेयर बेल्ट बनवायचा !! वधू वराने खाली वाकून उभे राहायचे आणि बेल्ट वर मोठ्यांनी चढायचे . एकाच्या पाया पडून झाले कि दुसर्याने यायचे आणि विमानतळावर सरकणाऱ्या सामानाप्रमाणे मोठे पुढे पुढे सरकत राहतील !! यांनी मात्र हात जोडून खाली वाकून उभे राहायचे !!

२.   आहेर न देणाऱ्याला जेवण मिळू नये अशी सोय !!

हल्ली आहेर आणू नये अशी तळटीप असते !! पण तरीही मनातून कोणीतरी काहीतरी आणले आहे का असे चपापून पहिले जात असतेच !! तर मग अशी तळटीप लिहिलीच नाही आणि आहेर आणला नाही त्याला जेवण मिळू नये अशी सोय केली तर ?? अशी एक अभिनव कल्पना एका सुपीक डोक्यातून आली .

त्यातून उगम झाला स्क्राच कार्डाचा . आहेर मिळाला कि करवलीने स्क्राच कार्ड द्यायचे आणि मग त्यात आलेला नंबर टाईप केला कि भोजन समयी चविष्ट पदार्थांच्या चवीचा आनंद घेता येऊ शकेल !! हि एक सुपीक कल्पना !!

३.  आहेर नाहीतर बाहेर !!

तळटीप बदलून आहेर नाही तर बाहेर अशी केली तर कसे ?? हि आणखीन एक अभिनव कल्पना !!

४. अक्षता टाकणारे मशीन

मुला मुलीच्या डोक्यापर्यंत अक्षता क्वचितच  पोहोचतात !! हल्ली काही लग्नांमध्ये रांगेत उभे राहून त्यांच्या जवळ जाऊन डोक्यावर अक्षता टाकणे असा एक प्रकार मी पहिला !! पण तो मंत्र पुष्पांजली नंतर देवापाशी जाऊन फुले वाहण्यासारखे झाले आणि ती कल्पना काही रुचली नाही आम्हाला !! म्हणजे मंगलाष्टके संपली कि मग डोक्यावर अक्षता !! त्यात मजा नाही .

म्हणून दारातून आत येताना पाहुण्यांनी अक्षतांच्या ताटावर हात ठेवायचा !! मंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी त्या अक्षता मशीन मध्ये टाकायच्या !! आणि सावधान असा शब्द आला कि मशीन मधून मुला मुलीच्या डोक्यावर अक्षता पडायला पाहिजेत  अशी सोय करायची !! मोठ्यांच्या आशीर्वादाचा आणि अक्षता मुला  मुलीच्या डोक्यावर बरोबर पोचतील याचा पूर्ण लाभ मिळेल !!

५.  नाव सुचवणारे मशीन

नाव घेणे हा आणखीन एक कठीण जाणारा प्रकार !!

म्हणून डिजिटल स्लायडिंग साईन बोर्ड अशी एक कल्पना आली !! म्हणजे प्रत्येक विधीच्या वेळी घायचे नाव त्याच्यावर दिसेल अशी सोय !!
जो विधी सुरु होईल त्या विधीशी संबंधित नाव त्या बोर्डावर दिसेल आणि मुलासाठी आणि मुलीसाठी अशी वेगळी वेगळी उखाण्यांची यादी सरकत राहील !! यादीतली २ एक नावे घेतली तरी पुरेल !!

अशा किती तरी विनोदी कल्पना मला गप्पा मारताना बहिणी नाहीतर मैत्रिणी सुचवत राहतात !! तुमच्या डोक्यात आहे का काही ऑटोमेशन ची कल्पना ?? आमचे ऑटोमेटेड लग्न बहारदार बनवायला ??


तळटीप : या प्रयोगांची कल्पना एक विनोदाचा भाग म्हणून घ्यावी !! गंभीरपणे घेतल्यास लग्नात ऑटोमेशनचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

Thursday, September 9, 2010

ती गेली तेव्हा..

" ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता " .... गाण्याचे शब्द कानावर पडले आणि अभिनव च्या गालावर त्याच पावसाचे थेंब ओघळले... ती जाऊन आज २२ वर्षे झाली.

" अनुज्ञा गेली. "  चे शब्द कानावर आदळले . आणि अभिनव कोसळला.

अनुज्ञा विमानतळावर त्याला सोडायला आली तेव्हाच तिला शेवटचे पहिले होते...किती आनंदात होती ती !! ती आई होणार होती . अभिनव ला तर तिला कुठे ठेवू नि कुठ नको असे झाले होते.

तिचे हास्य अजूनही तसेच.....नजरेसमोर तरळत होते ..ते सगळे चित्र...त्याला आवडते म्हणून तिने घातलेला पांढरा शुभ्र फ्रॉक !! किती सुंदर दिसत होता तिच्यावर. "हि छोटी मुलगी आता आई होणार का ?" अस म्हणत सगळ्यांनी तिची किती चेष्टा केलेली. आणि " असू देत हा मोठा माणूस तर बाप होणार आहे न ?? " असे म्हणत ती पण प्रत्येक चेष्टेला उत्तर देत होती.

अभिनव पण तिच्या सोबत बालपण जगत होता. मोठ्यांमध्ये किती सहज मोठी होऊन जायची ती. आणि लहान मुलांना तर ती प्रचंड आवडायची.

" अभिनव मला न छोतू  बेबी गल पाहिजे....... माझ्यासारखी छोतुशी !! " ...."बाप रे बाप म्हणजे मला दोन दोन लहान मुलांना सांभाळायला लागणार ....  त्यापेक्षा एक मोठा मुलगा... या मोठ्या माणसासारखा " .."" नाही हम्म दोन दोन नाही ... छोटू गल आली न कि मी मोठी होणार ...नको ....तूच मोठा चांगला रे !! नाहीतर मला खाऊ कोण आणेल ? " अस म्हणत असताना आपल्या हसण्यात सामील  झालेली अनुज्ञा आठवली आणि .... अभिनव पुन्हा कोसळला ....  तो मनातून कोसळून गेला होता पूर्णपणे ... विमान प्रवासातले उरलेले १२ तास त्याला नको नको झाले होते. तिचा हसरा चेहरा आता निष्प्राण कलेवारासारखा दिसेल या कल्पनेनेच त्याला गिळून टाकले .

 मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता ... 

हृदयनाथांचे शब्द कानावर आले आणि अनुज्ञाच्या आठवणीने मनावर  आलेले मळभ अजूनच वाढले.त्याने ओघळणार्या अश्रुना वाट मोकळी  करून दिली. 'हुबेहूब तशीच दिसते न आयुषी ?' या कल्पनेने क्षणभर सुखावला आणि स्वतःशीच हसला ..विमानातून दिसणारे दृश्य खरच सूर्य किरणांना सोडवत असल्यासारखे वाटत होते त्या दिवशी.

" अभिनव बाळा मुलगी झाली रे पण आपले बाळ गेले ... अनुज्ञा गेली."दुपारी अनुज्ञा च्या बाबांचा फोन आला

सकाळी अनुज्ञाला दवाखान्यात नेतानाच कल्पना आलेली कि आता हे मुल काही जन्माला येणार नाही. पण अनुज्ञाला काही होऊ नये म्हणून मनातून किती तरी वेळा नकळत हात जोडलेले त्याने . मिळेल त्या विमानाने परत ये हा फोन आला तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच पण ........अनुज्ञाला काही.......  छे मन चिंती ते वैरी न चिंती असा म्हणून त्याने दुर्लक्ष केलेले.. .आणि दुपारी अनुज्ञा च्या बाबांचा फोन आला ....सगळेच संपून गेल्यासारखे झाले ...

पांढरा शुभ्र फ्रॉक  ... गळ्यात मंगळसूत्र आणि जरासेच वाढलेले ते पोट घेऊन धडपडत  विमानतळावर आलेली अनुज्ञा नजरेसमोरून काही केल्या जात नव्हती. तिला "छोटू बाल येताना मी थांबेन हो माझ्या बाळासोबत " असे दिलेले वचन सुद्धा पाळता न आल्याची खंत त्याला आतल्या आत पोखरून टाकत होती. सातव्या महिन्यात हे असे काही घडेल याची कल्पना सुद्धा कोणी केली नव्हती .

विमानतळावर घ्यायला आलेला तिचा भाऊ पाहून तो कोसळला " अविsssssss.........हे काय रे ?? मला माझी अनु आणून दे अवि " असे म्हणत त्याने टाहो फोडलेला !!

अवि सोबत रत्नागिरी पर्यंतचा प्रवास संपेपर्यंत तो जरासा सावरला !! मुलगी झाली हि बातमी अशी ऐकायला मिळेल अशी कल्पना सुद्धा त्याने केली नव्हती !! हुबेहूब अनुसारखी दिसते या वाक्यावर पुन्हा एकदा अनु नजरेसमोर आली आणि त्याने आपला हुंदका आवरला ..

 अंगणात बरीच गर्दी जमलेली. बरेच लोक येऊन गेले होते. बर्फावर ठेवलेला तिचा देह पाहून अभिनव कोसळला !! अविला मिठी मारून त्याने पोटभर रडून घेतले . " फाज्जील उगाच बर्फ नाही हम्म... मला गार सहन नाही होत अजिबात .." तिच्या अंगावर शिमल्यात बर्फ उडवला तेव्हा तिची प्रतिक्रिया अशीच होती . आणि तिचे कलेवर असे बर्फात ?? त्याची वाट पाहत होती न ती ?? पण अशी ???

ती आई होती म्हणुनी घन व्याकूळ मी हि रडलो ... त्या वेळी वारा सावध ss...  पाचोळा उडवीत होता

या ओळी कानावर आल्या  .....

"अभिनव ... मुलगी ....." असे म्हणत अनुज्ञाच्या वाहिनीने आयुषीला हात दिले आणि " अनु आहे रे आपल्याsssत हि पहा " असे म्हणत अवीने त्याच्या खांद्यावर डोके ठेवून हमसून हमसून रडायला सुरुवात केलेली .  आणि मग हातातले मुल सावरत रडणारा अभिनव आणि अवि ....बाजूला अनुचा निपचित देह ...हे दृश्य अभिनव च्या नजरेसमोर आले .

"तिला न्यायची सोय झाली आहे अभिनव. फार वेळ आता ठेवायला नको ..." गर्दीतून कोणीतरी मोठ्यांनी सुचवलेल्या वाक्यानिशी अंत्ययात्रेची सुरुवात झालेली . तिन्हीसांजा तिला निरोप देऊन सगळे परतले . घर शांत होते. पूर्ण  वाड्याला संजीवनी देणारी अनुज्ञा नव्हती. घर अंधारून आले होते. अंगणात रडणाऱ्या आयुषी ला घेऊन अनुज्ञा ची वाहिनी चकरा मारत होती. याच अंगणात अभिनव अनुज्ञा सोबत लहान मुलासारखा उड्या मारत खेळत होता ... तिथे तिच्या मुलीला खेळवायला तीच नव्हती...

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

त्या दिवशी अभिनव एकटा झाला होता . अनुसोबतचे अवखळ अल्लड क्षण आता संपले होते आणि ते तसेच पुन्हा कधीच जगता येणार नव्हते. उरली होती फक्त एक कधीही न भरून येणारी पोकळी !! विचारात हरवलेला ... आयुषीच्या आयुष्याला उजेड देण्यासाठी अनुज्ञा ने तेवत ठेवलेला ...एकटाच ..... अभिनव !!

" बाबा रे तुला किती वेळा सांगितले... हे गाणे लावायचे नाही म्हणून ... हे गाणे ऐकलेस कि उगाच रडत बसतोस ... आणि अंधार काय केला आहेस हा खोलीत ??  चल चल उठ.. " आयुषीच्या आवाजाने तो भानावर आला . दिव्याचा उजेड खोलीत पसरला आणि समोर ... पांढऱ्या शुभ्र फ्रॉक मध्ये ... अनुज्ञा ??? ... अनुज्ञा चा भास .. आयुषी !!  ....... अनुज्ञा ने दिलेली अनमोल भेट .....

Thursday, July 8, 2010

कसे सरतील सये

" कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ....सरताना आणि सांग सलतील ना ? गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसु मुसु पाणी सांग भरतील ना ? "  हे कसे काय समजले  या कवीला ?  ती मला जेव्हा म्हणाली कि " मी लग्न करतीये "  तेव्हा असेच विचार आले मनात  . नोकरी नव्हती मला तेव्हा. आता गाड्या घोडे आहेत तर तीच नाही. पण हो.... मला वाटले होते कि कसे जमेल तिला माझ्याशिवाय जगणे ?  एक दिवस मी गावी घरी गेलो तर रडू बाई व्हायची तिची. मी आलो कि घट्ट मिठी मारून  " मला सोडून देणार नाहीस ना ? "  असे म्हणायची ....ती आज मला सोडून जातेय ?  असे  सगळे वाटलेले मला पण तिने निर्णय घेतला होता. हे सगळे घडले तेव्हा हा कवी तितकासा प्रसिद्ध नसावा. पण त्याने कसे ताडले हे सगळे ? 

त्या दिवशी हे गाणे ऐकून ती नजरेसमोर आली. अगदी तशीच !! तशीच असेल का ती अजून ?? फार नाही ६ वर्षे झालीत तिच्या लग्नाला . पण मी तसाच आहे . तिच्या आठवणीने तिचा सुगंध अनुभवणारा !! तिने दिलेल्या स्वेटर मध्ये तिची उब शोधतोय. पण .....

भेटली होती लग्नानंतर. " आवडलेत ते मला. ठावूक आहे  ? ते माझी खूप काळजी घेतात . पण मला अजून तुझी वाटायची तितकी काळजी नाही रे वाटत त्यांची. असे का हेच कळत नाही आहे .पण .... पण तू गावी गेल्यावर साप पकडलास म्हणालास ना तेव्हा चक्क देव घरातल्या नागोबाला दुधाचा नैवेद्य केलेला मी !!! तसे काहीतरी  यांच्यासाठी करावे वाटते पण ते वेड नाही रे जाणवत माझ्यातून . पण म्हणून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे पण नाही . कळतच नाही.... हे असे मन सैरभैर झाले आहे. ते हवेत पण आणि तू नको पण आहेस . पण ....  वाटते तुझ्यावरचे प्रेम निस्वार्थी होते आणि यांच्यावर माझे प्रेम स्वार्थापोटी आहे.  त्यांना काही झाले तर माझे कोण असे वाटते म्हणून .. पण तसे मला तुझ्या बद्दल पण वाटायचे रे ... नकोच होते प्रेमात पडायला .. हे असले प्रश्न नसते पडले मला. " असे काही पण बरळत होती. प्रेमात पडली तेव्हा अल्लड होती पण आता पोक्त वाटत होती.......खूपच !!वाटले ज्या अल्लड पणावर भाळलो तोच हरवला आहे. आणि जाणवले ती माझी होती ....तेव्हा जी होती... जशी होती.... तशी नाही ......म्हणजे आता ती माझी नाहीच !!!  शरीर... मन ....यापेक्षा त्या जुन्या स्वभावाने  आवडलेली ती माझी नाही.माझी ती आणि आता आलेली ती आता तीच नाही आहे . शरीर तेच पण आत्मा जणू बदलून गेलाय पार !!!

आता मला तिची आठवण येते पण म्हणून मला ती हवी आहे असे नाही आहे. खरे तर आता मी पण मुली पाहतो आहे माझ्यासाठी. पण तिची आठवण अलगद मोर पिसा सारखी स्पर्शून जाते आणि मग तो मखमली स्पर्श  अनुभवत रहावासा वाटतो. 


प्रत्येकाचे पहिल्या प्रेमाच्या बाबतीत असेच होत असेल का  ? हो अर्थात जे लग्न करतात ते नाही पण तरी ...

भूतकाळात काही गोष्टी  अशाही असतात ज्या हव्याशा वाटत असतात .  ते भूतकाळात नेणारे मशीन खरच असते तर किती छान झाले असते असे वाटायला लागते. पण ते केवळ त्या क्षणापुरते वाटते.  भानावर आले कि कळते एक सर बरसून गेली आणि रान हिरवेगार झाले. पण म्हणून ढगाने त्याच रानावर राहायचे आणि कायम बरसत राहायचे असे म्हणून कसे चालेल. कधी न कधी तो पण रिता होईलच ना ? आणि अखंड बरसला तर रानाचा हात थिटा पडेलच ना ??  शेवाळे साचेलंच ना ??


असे होत असेल का प्रत्येकाचे पहिल्या प्रेमाबाबत ?

खूप दिवसांनी तिची आठवण आली .....कारण काल मला भेटलेली मुलगी मला खरच आवडली .  त्या मुलीची तिच्याशी तुलना करण्याची चूक मी केली नाही !! ती चूक तिने केली !! हो..... तिने माझी आणि तिच्या नवऱ्याची तुलना केलेली !!  मी आज भेटलेल्या मुलीला फक्त ती म्हणून पहिले !! तिची तुलना मला आवडलेल्या , मी जिच्या प्रेमात पडलो होतो अशा माझ्या भूतकाळातल्या सौंदर्याबरोबर नाही केली . मी ठरवलंय ..... मी माझ्या आयुष्यात  येईल त्या मुलीला कायम खुश ठेवेन .  पण तिचे सौंदर्य आठवलेच !!  कारण तुलना करायची नाही असा म्हणताना तुलना कशासोबत नाही करायची ह्याचा विचार आलाच मनात ! ठरवले तसे वागताच येत नाही का मला ??  विसरूच शकत नाही आहे मी तिला . म्हणजे मग मी पण तिच्यासारखे वागेन का ?? माझ्या बायकोशी  वागताना कायम तिचा विचार येईल माझ्या मनात ?? भूतकाळ काही असला तरी वर्तमान आहे तेच राहणार आहे हे मला मान्यच होत नाही का  ?? " वाटते तुझ्यावरचे प्रेम निस्वार्थी होते आणि हिच्यावर  माझे प्रेम स्वार्थापोटी आहे. " असे ती मला भेटली कधी तर तिला सांगेन का मी ?? 



पिसाटले मन थाऱ्यावर नाही  येत आहे !! असे का ??? कशामुळे ?? या विचारांमधून बाहेर यायचं आहे मला !!

तो

मुसळधार पावसात एक दिवस भेदरलेला तो थेट घरात शिरला. थरथर करणारे त्याचे अंग चिंब भिजलेले होते. त्याचे भिजलेले रुपडे पाहून त्याला जाऊन घट्ट मिठीत घ्यावे असा वाटत होते.

आईने त्याला घरात घेतलेच !! अगदी हट्टाने !! म्हणजे आता आमचेच  दार उघडे आहे पाहून या मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी तो घरात शिरला तर त्यात गैर काय आहे ?? असा सवाल केल्यावर नेहमीप्रमाणे बाबा गप्पच बसलेले.  " अहो मागे त्या समोरच्या झाडाखाली पावसापासून वाचण्यासाठी जोडपे उभे राहिलेलं आणि वीज पडलेली आठवते न  ?? त्यांना घरात बोलवायला पाहिजे होते हि हळहळ मागाहून होती न तुम्हाला ??  मग हा आला आपल्या घरात तर बिघडले काय ?? तुला करायचीये न ग त्याला मदत कर जा  " आई म्हणाली . तिचे हे कोकणी संस्कारातले संभाषण तिच्या भाषणात परिवर्तीत होण्या आधी बाबा खोलीत शिरले  " काय करायचे ते करा . हि पोरगी हातातून गेली न तुझ्या लाडात मग समजेल . " असा मोठा आवाज मात्र खोलीतून बाहेर पडत होता. हो पण ते ऐकण्यासाठी मी खोलीत नव्हतेच !! मी केव्हाच दाराकडेपळालेले !!

त्याचे डोळे किती बोलके होते. आणि केसांवरून ओघळणारे पाणी त्याच्या डोळ्यांपाशी आले कि किती मोहक वाटत होते !! आणि त्याच्या डोळ्यातून किती प्रेम दिसत होते !! माझ्यासाठीच  असेल का ते प्रेम ?? मी मदत केली त्यासाठी आभार मानायला शब्द नसतील त्याच्याकडे ...म्हणून डोळ्यांची भाषा बोलत होता !!

पाऊस थांबणे कठीण वाटत होते. बातम्यांमधून पण पूर आल्याचे कळत होते. अशा वेळी त्याने बाहेर जाणे मला आणि आई ला मान्य नव्हते. त्याच्या अवती भोवती फिरताना त्याच्या बद्दलची नापसंती बाबांच्या डोळ्यातून समजायची !! त्याचा या घरातला पहिलाच दिवस होता त्यामुळे त्याच्या खाण्या पिण्याच्या वेळा किंवा काही असं आम्हाला ठावूक असणे शक्यच नव्हते. आणि आता आमच्या घरात आमच्या प्रमाणे राहायचे हे त्याला पण मान्य असावेअसं त्याच्या एकंदर वागण्यातून वाटत होते.

मी मात्र त्याला एक क्षण पण एकटे सोडले नव्हते. म्हणजे त्याच्या पासून दूर जावे असे वाटतच नव्हते मुळी मला !!  त्या दिवशी जेवण मी आणि त्याने आणि आई ने एकत्र घेतले. अंगणातल्या शेड मध्ये पाउस पाहत पाहत आम्ही जेवलो. बाबा आले नाहीत !! त्याच्या पंगतीला बसणे त्यांना मान्य नव्हते जणू काही !! त्या रात्री त्याचा बिछाना पण माझ्या शेजारीच बाहेरच्या खोलीत लागलेला . आमच्या तीन खोल्यांच्या घरात जेव्हा बाबांना त्याचे असे इतका वेळ घरात थांबणे मान्य नव्हते तेव्हा मला त्याला माझ्या सोबत बाहेरच्या खोलीत झोपवून घेणे भाग होते.

अंगणातल्या शेड मध्ये बिछाना होईल त्याचा असं बाबांचे म्हणणे आम्ही कसे मान्य करणार होतो ?? थंडीने गारठून जाईल असं वातावरण होते बाहेर!! तो कदाचित खूप दमलेला !! आणि गाढ झोपून गेला !! पण मी मात्र त्याच्याकडे पाहत राहिले !! बराच वेळ !!   मनापासून आवडलेला मला तो !!  ' पण उजाडले कि तो आल्या वाटेने गेला तर ?? '  मनातून भीती !!

' अजून आमची तशी खाशी मैत्री पण नव्हती झालेली !! आणि एक दिवस थोडीच पुरतो मैत्री  व्हायला  ?? '  त्याच्या जाण्याच्या भीतीने मनात वादळ !! तशीच मला केव्हा झोप लागली समजलेच नाही !!

उजाडले तेव्हा तो त्याच्या बिछान्यात नव्हता !! मी डोळे किलकिले करून पहिले !! बाहेर अंगणात तो होता .... बाबा पण होते !! आणि त्यांची मैत्री झालेली होती !! ते एकत्र चक्क खेळत होते !!  बाहेर हवा पण मोकळी झालेली !! सूर्याने पण हसून त्यांच्या मैत्रीला दाद दिलेली !! अर्थातच त्याचे आमच्या घरात बाबांनी पण स्वागत केले होते !!

' म्हणजे आता तो जाणार नाही ? '  मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या !! कालच्या पावसाने आमच्या घरात एक नवीन सदस्य आणला होता!!

" खंड्या ये "  बाबांची हाक !!

" खंड्या ??  पण मी तर त्याचे नाव tommy ठेवणार होते !! शी हे बाबा पण ना !! खंड्या काय नाव आहे का?? "

मी पण उठून त्यांच्या खेळत शामिल झाले !!

" खुश का बाई आता ?? कुत्रे पाळणे सोप्पे काम नाही आहे !! अहो त्याने ती खोली केलेली घाण हिला दाखवा !! आता त्याच्या सगळ्या वेळा पाळायच्या !! तो आता आपल्या घरातला सदस्य झाला !! "

मी मनातल्या मनात टुणकन उडी मारली आणि त्याला कुशीत घेतले !! " माझा खंड्या !! "  शेवटी बाबांनी कुत्रे पाळायला परवानगी दिलीच आज  !!

Wednesday, June 9, 2010

मीटिंग

मीटिंग मध्ये बसून मीटिंग बद्दल लिहिण्याचे धारिष्ट्य आमच्यासारखे मीटिंग मध्ये लक्ष नसलेलेच करू शकतात !! पण माझे मीटिंग मध्ये बसलेल्या प्रत्येकावर लक्ष होते म्हणूनच ह्या लिखाणाचा जन्म झाला आहे . अर्थात या प्रकरणाचा मला किती कंटाळा आहे असे वाटून घेऊ नकात. उलट माझ्या आतला कलाकार या कामाच्या धबडग्यात जागा राहतो..... आणि त्याला जागे ठेवणारी जागा म्हणजे मीटिंग रूम .


मीटिंग !! काय शब्द आहे हा !! कोणी शोधून काढला असले देव जाणे पण हे प्रकरण शोधणारा एक तर अतिशय कामसू असेल , किंवा कामाचा कंटाळा आला म्हणून त्याने एकत्र गप्पा मारण्याची जागा शोधली असेल . मग ऑफिस च्या वेळेत गप्पा मारण्याचा उत्तम मार्ग म्हणून त्याने त्याला मीटिंग असे नाव दिले असेल. चला आपण पहिली शक्यता खरी मानू कारण दुसरी शक्यता शक्य असण्याची शक्यता जरा कमी वाटते ( मीटिंग च्या चर्चेत हे असले अशक्य शब्द मला सुचत आहेत )


काय चालते नेमके या मीटिंग मध्ये??? तर .... इथे खरोखर काम करणारी माणसे बोलत असतात ( आत्मीयतेने वगैरे विशेषण लावता येईल असे बोलतात हो हे लोक !!! ) , आणि काम न करणारे लोक एखादा असा कामाचा प्रश्न विचारतात कि ज्याची चर्चा उगाच ताणली जाते आणि मग मीटिंग ची लांबी वाढते .अर्थातच काम न करणाऱ्यांना ते हवेच असते , जेणेकरून आपल्या जागेवर पुन्हा लवकर जाण्याची वेळ येऊ नये आणि कामाला पुन्हा एकदा ( आधी केलेली असते कि नाही ठावूक नाही पण म्हणूयात पुन्हा एकदा ) सुरुवात करावी लागू नये.


आता प्रेझेन्टेशन देणारा उगाच साहेबाला घाबरून सज्जनपणे बोलत असतो. आणि लिहून आणलेले मुद्दे नीट नेटक्या पद्धतीने मांडत असतो. साहेबगिरी गाजवताना साहेब पण न चुकता एखादा मुद्दा ठळकपणे हे संगयाला हवे असे उगाच आंग्ल भाषेत सांगत असतो. आणि प्रेझेन्टेशन देणार्याला अजून बोलायला प्रवृत्त करत असतो.
काही जण तोंड उघडून जोरात आवाज काढून जाम्भयी देता येत नाही म्हणून तोंड दाबून बसलेले असतात आणि मग जरा जरा वेळाने ते डोळे टिपत असतात. काही जण उघड्या डोळ्यांनी चक्क झोपलेले असतात.आता डुलक्या घेताना त्यांची मान होकारार्थी हलत असते कि ते खरच मधून मधून जागे होऊन मान डोलावून आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असतात ते त्यांचे त्यांनाच ठावूक पण अधून मधून माना हलत असतात हे खरे.

काही लोक गालातल्या गालात हसत एकमेकांना काहीतरी खुणावत असतात. कोणी डोळे चोळत असते , कोणी नाक खाजवत असते , कोणी कान खाजवत असते. गम्मत म्हणजे नको तिथे खाज येत असल्याने अस्वस्थ !! असे पण काही प्राणी असतात !! वहीत टिपणे काढण्याच्या निमित्ताने शेजारी शेजारी बसून काही लोक ब्लॉग पोस्ट लिहित असतात . वहीत टिपणे काढण्याच्या निमित्ताने शेजारी शेजारी बसलेले दोन लोक एकमेकांना " तो पहा $$$$ कसा डुलकी घेतोय " अशा लोकांकडे वेधून घेणाऱ्या सूचना करत असतात. अचानक कोणीतरी हलवल्यावर जागे होणारे असतातच !! ते मधेच एखादे वाक्य ऐकलेले असते त्याला अनुमोदन देऊन मोकळे होतात ( मनातल्या मनात हुश म्हणतात !! ) .

हो पण याचा अर्थ तीथे कोणाचेच लक्ष नसते असे नाही हम्म !! बाहेर गेल्यावर नेमके आपल्या गळ्यात कोणते काम पडले आहे आणि त्याच्याशी संबंधित माणसे कोण आहेत याच्याकडे प्रत्येकाचे लक्ष असते . बाहेर जाऊन कोणाला कोणता प्रश्न विचारायचा याची तयारी झालेली असते. काही लोक खरेच चर्चा आणि त्यातून पुढे तयार होणार वाद याच्यात प्रामाणिक सहभाग घेत असतात . काही लोक आपल्याला हलवल्यावर योग्य मुद्द्यावरच बोलत असतात. काही लोक हे आधण अजून जरा वेळ कसा चालेल ते पाहत असतात.
बाहेरचा पाऊस सगळ्यांना बोलावत असतो . पण ए सी ची कुबट हवा सोसत सगळेच बसलेले असतात.छान चहा हवा असे मनातून वाटत असते.आता आमच्यासारखे काही लोक बाहेर बसलेल्या एच आर ला चहा पाठव असा एक मेसेज टाकतात आणि मग मीटिंग आवरती घेऊन चहा नको आता झालंच आहे असे सांगून साहेब मीटिंग थांबवतात .

पण मला मात्र हि मीटिंग चालूच राहावी असे वाटते कारण माझ्याकडून एका नवीन कलाकृतीचा जन्म होत असतो . आणि मला ते काम पूर्ण करूनच बाहेर पडायचे असते .कारण मीटिंग मध्ये माणसे जितकी जास्त तितका सावळा गोंधळ आणि लोकांचे बारकावे टिपण्याची संधी जास्त असते. तितके लिहायला मुद्दे जास्त असतात. पण या सगळ्यापेक्षा पावसासोबत एक कप चहा हवा म्हणूनपळायची घाई जास्त असते म्हणून मी पण मीटिंग रूम मधले लिखाण आता आवरते घेते आणि पावसाकडे धावत जाते.

Friday, May 28, 2010

पहिली रात्र

पहिली रात्र हि कल्पना हिंदी सिनेमाने ठरवून दिली आहे. कल्पना करायची ठरवली तर सेज पे  शरमाती  हुई नटी आणि शेर म्हणत शेर सारखा खोलीत येणारा नट असे चित्र नजरेसमोर येते नं ? पण ती सुहाग रात असते  . ती पहिली रात्र ....असे आपण मराठीत केलेले भाषांतर आहे असे  म्हणूयात!!!!

माझ्या आयुष्यात मात्र खूप पहिल्या रात्री आल्यात  ( वाचून माझ्यावर संशय आला न  ? ) , गैरसमज नको.... पण खरच माझ्या आयुष्यात  मात्र खूप पहिल्या रात्री आल्यात. आणि त्यांचीच हि आठवण.

हो..... माझी सगळ्यात पहिली रात्र होती तेव्हा मी काय केले असेल अंदाजाने सांगते..... तिला मी माझी पहिली.. पहिली रात्र म्हणते . म्हणजे ...माझा जन्म झाला ती रात्र ...माझ्या आयुष्यातली पहिली... पहिली रात्र होती.  जन्म रात्री १ वाजता झाला त्यामुळे माझी पहिली रात्र रडतच गेली असेल असा माझा एक अंदाज !!

म्हणजे बालवाडी ....पहिलीत... काही आठवत नाही त्या रात्री मी काय केले म्हणून मग थेट मोठी उडी मारतेय माझ्या मोठ्या शाळेवर ....

पुढे मला समजत होते तेव्हाची पहिली रात्र म्हणजे मी पाचवीला शाळेत जाऊन आले  ती रात्र. त्या रात्री मी खूप खुश होते. नवीन शाळा ( आम्ही त्याला मोठी शाळा म्हणायचो तेव्हा .. ) , सगळे काही नवीन. आणि त्यात मला हवी ती म्हणजे अ तुकडी मिळालेली. त्यामुळे माझी स्वारी खूप खुशीत होती. आता मी या शाळेत खूप अभ्यास करेन . आणि नेहमी गृहपाठ पूर्ण ठेवेन असे नवीन नवीन बेत. थोडक्यात माझे शालेय आयुष्य खूप सुंदर कसे बनेलयाचे बेत आखत आणि स्वप्ने रंगवत मी झोपून गेलेले.

मग शाळा , अभ्यास , आणि मग परीक्षा या सगळ्यात  " कुठून मी मोठ्या शाळेत आले रे देवा ?  छोट्या शाळेतच छान होते "  असे वाटायला लागले .  आता पुढच्या पहिल्या रात्रीची स्वप्नं पाहत मी दिवस मोजत होते . शाळा संपली कि मग मी कॉलेजात जाणार अशी स्वप्नं पाहायला लागले.

लवकरच ती पहिली रात्र पण आली. चक्क दहावी पास  होऊन मी कॉलेजात आलेच !!  पहिल्यांदा तिथे गेले ना.... तर खूप मोकळे वाटले . म्हणजे.... हेच हवे होते मला असे वाटले.  नकोत ते सर जे पांढरे बूट नसले कि मग रागवतात आणि नको तो युनिफोर्म . रोज नवीन कपडे ....आहा !! तास बुडवा , पळून जा  ... सगळे हवे तसे.... हो कॉलेजातून आल्यावर पहिल्याच दिवशी कॅन्टीन मध्ये वडा पाव खाऊन आले आणि किती तरी वेळ मी माझ्या कॉलेजात मी काय काय करेन याचे बेत आखत होते आणि स्वप्न रंगवत होते.

मग समजले अरे इथे शाळेपेक्षा जरासे कठीणच आहे. अभ्यास किती वाढलाय ??  तास बुडवून काही काही नाही होणार. तासाला बसले तर निदान काहीतरी समजेल. आणि आता रोज काय नवीन घालू हा प्रश्न . आणि आईने अकरावीतच गाडी मिळणार नाही अशी तंबी दिली आणि मग पुन्हा सायकल आणि मी ... मला हे नको होते. आता मेडिकल कि इंजिनिअर हा एक नवीन प्रश्न आलेलाच होता सोबत. पुन्हा एकदा " कुठून शाळा संपली रे देवा ??  हे रोज उशिरा पर्यंत क्लास आणि मग अभ्यासाचा त्रास. हे जुनिअर आयुच्या नकोच. सिनिअर व्हावे पटकन म्हणजे सुटले मी . " पुन्हा तेच पुढचे बेत , पुढची स्वप्ने ..... आणि... माझी पहिली रात्र!!!

सिनिअर कॉलेजात आल्यावर भावनांमध्ये काही बदल नाही झाला.... आता नोकरी आणि पुढे काय शिकायचे हे प्रश्न सोबत होतेच. आणि त्यांच्याबद्दल वेगळे काही नव्हते पण हो.... आणखीन एक गोड स्वप्न होते . लग्न आता मला प्रश्न सुटतील अशी एकच जागा होती . मी लग्न करेन आणि घरात बसेन. नवरा कमवेल आणि मी मजा करेन. हे स्वप्न !!!  त्याचे बेत !!!  घर कसे सजेल इथ पासून काय करावे कसे बनवावे इथपर्यंत सगळेच..... तर या काळातली स्वप्ने मोठी होती, आणि नेहमीप्रमाणे पुढच्या पहिल्या रात्रीची स्वप्ने पाहणे हा नियम मी सोडला नव्हता. 

हो.... पण ..... अजून त्या पुढे काय हे अनुभवले नाही. पण नेहमीप्रमाणे हि रात्र गोड आणि मग " अरे देवा याच्यापेक्षा एकटीच बरी होते " हि भावना आणि मग  पुढच्या पहिल्या रात्रीची स्वप्नं!!! हे चक्र चालत राहील ना ??

 जशी मी आले तसे आणि कोणी येईल याची स्वप्नं आणि मग त्या लहानग्या जीवाच्या आयुष्यातले ते सगळे क्षण आणि त्या सगळ्या पहिल्या रातींची स्वप्नं !! आई ने सुद्धा पहिली असतीलच ना ती सगळी स्वप्ने माझासाठी ?? माझ्या प्रत्येक पहिल्या रात्रीत तिची पण एक पुढची पहिली रात्र असेल नाही ??

प्रश्न ... त्या प्रत्येक फेज चा कंटाळा ....आणि मग पुढे काहीतरी छान असेल ....हे एक गोड स्वप्न !! हे चक्र प्रत्येक जण जगत असेल नाही ?

यात सगळ्यात सुखाचा काळ असतो ..." पहिली रात्र" . आपल्याला हवे ते मिळाले आहे हि भावना.... आणि त्यातून मिळणारे समाधान... हे सगळ्यात जास्त केव्हा असते  ?? तर त्या प्रत्येक पहिल्या रात्री जेव्हा आपण आपल्याला हवे त्या शिखराकडे जाणाऱ्या पुढच्या पायरीवर चढतो आणि  एका रात्री साठी त्या पायरीवर निवांतपणे विसावतो. तीच तर असते  कल्पना केलेली पुढची पहिली रात्र ....

ती सेज.... ती फुले ....असतात ...आपल्या कल्पनेत....  आणि ती प्रत्येक पहिल्या रात्री असतात आपल्या सोबत . हो ....पण शेर सांगणारा शेर आणि शेर  ऐकणारी शेरनी एकदाच येते !!! प्रत्येकाने कल्पना केलेली असते ना  .....सिनेमातली पहिली रात्र !! त्याच दिवशी !!!

Wednesday, May 26, 2010

सोबत

भाजी वाल्याशी हुज्जत घालणाऱ्या देशपांडे काकूला  पहिले आणि काकांची आठवण झाली.

देशपांडे काका .... बोलता बोलता कविता करायचे. कारकुनी नोकरी असली तरी फक्त हिशोबाची वही नाही तर बरेच काही लिहिणारे देशपांडे काका .... बोलता बोलता कविता करणारे देशपांडे काका...... " सोनू ..... एक दिवस माझे पण नाव येईल या व पु आणि हे कोण कवी लोक आहेत त्यांच्या सोबत "... असे म्हणणारे  देशपांडे काका.... आणि आमच्या फुटकळ दाद देण्यावर सुद्धा मनापासून खुश होणारे वल्ली ... देशपांडे काका !!

५०००० रु साठले कि माझे पुस्तक छापेन असे कायम स्वप्न पाहत जगणारे देशपांडे काका....

काका आणि काकू असे हे सरळ रेषेसारखे सरळ आयुष्य जगणाऱ्या दोघांचे कुटुंब. काका आणि काकुनी माझ्यासारखी खूप मुले आणि कबिलाच म्हणूया असा गोतावळा लावून घेतला होता. आणि खरच काकुच्या हातच्या पदार्थांना  चवच न्यारी !!  आणि ते चाखणारे आम्ही आणखीन न्यारे !!  काकांचे खूळ एकच त्यांना आपले पुस्तक प्रकाशित करायचे होते.

कुठून तरी पिवळ्या पडलेल्या वह्या काढून आवर्जून कविता वाचून दाखवणे आणि मगच  "अहो आता चहा आणा आमच्या रसिकांसाठी " अशी काकुकडे फ़र्माईश  करणे हा काकांचा  आवडता नाद  होता . आणि त्या चहा साठी त्यांच्या कविता ऐकण्याचा नाद आम्हाला पण जडला होता. मनापासून सांगायचे तर ते खरच खूप सुंदर लिहायचे.

" एक होती परी .. सुंदर गोरी गोरी .. देवाचं घर स्वच्छ ठेवी भारी  "  हि कविता त्यांनी मला स्पर्धेसाठी खास लिहून दिली होती आणि हो त्याला चक्क शांता शेळकेंची दाद मिळाली होती. " छान आहे अशीच लिहितरहा "  हा त्यांचा ठेवा अजूनही माझ्या वहीत आहे. पण ती दाद पाहून काकांनी " अहो पाहिलंत का ? सोनुला शांता बाई म्हणाल्यात ? अशीच लिहित रहा .. म्हणजे मलाच हा संदेश नाही का ? "  .. " हो त्यांना काय जातंय दाद द्यायला ?? लहान पोरींनी लिहिले आहे वाटून दाद दिली आहे त्यांनी . तुम्ही वही नेली असती न तर थेट भिरकावून म्हणाल्या असत्या अहो हे काय लहान मुलासारखे लिहले आहे  ? " इति काकू . " हो पण अहो त्यांना ती लहान मुलीने लिहिले आहे असे वाटणे हि पण दादच नाही का ? " काका 

हे संवाद नवीन नव्हते . चहा हातावर टेकवताना " तिकीट लावा हे सगळे येतात का पाहू. काय ग सोने येशील का ? चहा देणार नाही मी... फक्त कविता ऐकायच्या " असे काकू म्हणाली नाही तर आज काहीतरी चुकलं  असे वाटायचे. पण तीच काकू काकांची समीक्षक होती. संध्याकाळी घराच्यापायऱ्यांवर बसून काकांनी काकूला ताजे ताजे ऐकवायचे आणि  हातात वाती धरून काकू ने ते ऐकत हे असे का नाही लिहित म्हणायचे हे दृश्य आता सगळ्यांच्या सवयीचे झाले होते. त्यांना तसे पाहताना लग्न ठरले तेव्हा मी नवऱ्याला म्हणाले होते " आपण पण असे म्हातारपण जगायचे"  " तू नाहीस ना कविता वाचणार ? " असे म्हणून त्याने माझी टर उडवली होती.

काकांचे पैसे साठवणे नेमाचे होते आणि काकू पण पदरमोड करून पैसे साठवत होत्या. महिन्याला ५०- १०० कसे जमेल तसे आणि तेवढे काकू " कविता संग्रहासाठी फंड " असे लिहिलेल्या पेटीत पैसे टाकत रहायची. आणि आम्ही पण चार आठ आणे टाकायचो. खाऊ ला शाळेत मिळायचे ते. मी दुसरी तिसरीत होते तेव्हापासून हे स्वप्न त्यांच्या इतकेच मी पण पहिले होते. पहिला पगार आला तेव्हा मी ५०० रु घेऊन गेले आणि काकांनी  " सव्वा रुपया टाक सोने पुरे तेवढा !! " असे म्हणून सव्वा रुपया आपल्या फंडात टाकलेला.

मला आठवते.... पगार झाल्यावर सहाच महिन्यात काकांनी "५०००० रुपये जमले हम्म सोने "  असे म्हणून मला पेढे भरवलेले . " आता प्रकाशक पाहायला हवा. "  असे म्हणून प्रकाशकाकडे खेपा घालणे त्यांनी सुरु केले होते.  रोज ह्या ना त्या कारणाने त्यांचे लेखन नाकारले जात होते. पण निराशा नव्हती. त्यांची हि भावना पण कवितेतून आलेली. 
                           बाजारात विकण्यासाठी शब्द नाही मांडले , अन बाजारासाठी त्या शब्द माझे सांडले. 

वर्षभर काका खेटे घालत होते. साठी आली असेल त्यांची . पण " अभी तो जवानी कि शुरुवात हे सोनी  " असे म्हणत ते धावत राहिले. त्या फंडातून बरचशी रक्कम  प्रकाशकांकडे खेटे घालताना खर्च व्हायची. पण आमच्यासाठी येताना खाऊ आणणे त्यांनी कधीच नाही सोडले .   काकांचा षष्ठी होम मी आणि आमचा गोतावळा यांनी मिळून घरातच केला. आणि मग काकू पण नटून थाटून शामिल झाली. " सोने पोर नाही पोटची पण तू आहेस गं . नाहीतर यांचे असे वेड पांघरून जगणे आता सहन नाही होत. काल त्यांचे कसले पगारातून कापले जायचे कसला प्रोवी काहीतरी... फंडाचे पत्र आलंय . तू पहा बाई . ते पैसे पोस्टात टाकू. नाहीतर त्यांच्या फंडात जातील ते. " असे डोळ्यात पाणी आणून काकू म्हणाली तेव्हा पहिल्यांदाच काकांच्यावेडाचा तिला त्रास होतोय असे जाणवले. तोपर्यंत तिने कधीच तक्रार म्हणून नाही केली.

दोन खोल्यांचे घर आणि वर्षाला ३ साड्या हे आयुष्य हसत जगली. आणि फंडात पैसे टाकत राहिली . ती काकू खूप वेगळी वाटत होती. पण अगदी लक्ष्मी सारखी  दिसत होती त्या दिवशी काकू. त्यात तिने डोळ्यात पाणी आणू नये असे खूप वाटले .

पण शेवटी काकांना एक प्रकाशक मिळाला. आणि पुस्तक छपाई ला प्रेस मध्ये गेले सुद्धा !!!  त्या दिवशी काकूचा आनंद पाहण्याजोगा होता. "  पुस्तकाच्या १० हजार प्रती सोने १० हजार. पहा आता " ... " काका मला सही करुन द्यायचे हम्म पुस्तक " असे म्हणत त्या आनंदात शामिल झालेली मी . सोन्याचाच दिवस होता तो.

पुस्तके छापून आली. आता प्रसिद्धी ?? त्याचा विचार आम्ही कोणी कधी केलाच नव्हता. बरे असाच पत्रिका छापणारा कोणीतरी  होता आणि प्रकाशक म्हणून त्याने पुस्तक छापून दिले होते आणि प्रसिद्धीची जबादारी काकांनी आपल्याच खांद्यावर घेतली होती हे नव्यानेच समजले. मग मी थोडी पुस्तके फुकट ऑफिसात वाटावीत असे ठरले. 

तसे मी केले सुद्धा , आणि मग कोणी ती विकत घेईना .कारण .. " कविता संग्रह खरेदी करुन कोण वाचेल आग सोनाली ? "  ... " फारच छान आहे हो सोनाली. मग मी हे भेट म्हणून ठेवून घेऊ ना ? " " सोनाली मला ना हि छान आयुष्याचे स्वप्न फारच आवडली . बाकी ठीक ठक आहेत ."  या प्रतिक्रिया हे मुख्य कारण होते.

वर्षभर ती पुस्तके बाहेर अंगणात असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पडली. काकांचे पण वय वाढत होते. आणि  पुस्तकाच्या छपाई ला ६० हजार रुपये लागले म्हणून काकूचे तोडे गहाण टाकले आणि १० हजार रुपये उचलले हि कबुली काकांनी दिली आणि घरातले वातावरण गढूळ झाले .  काकू ची बडबड आणि वाद वाढले. ती पण थकली होती. आणि काका विश्वास गमावून बसले होते.

अशातच एक दिवस मेंदू मध्ये ताप गेला आणि काका गेले. माझा साडीचा पदर ओला होईपर्यंत काकू रडली. " सोने हा माणूस प्रसिद्ध झाल्याशिवाय मरू कसा शकतो ? " असे पुन्हा पुन्हा म्हणत राहिली.  अशी हतबल आणि रडताना काकूला मी त्याच दिवशी आणि त्या नंतर प्रत्येक दिवशी पहिले.

वाती वळताना हातातला कापूस भिजून जायचा आणि काकूला भानच नसायचे. मी गेले कि म्हणायची " आता चुका काढायला कोण गं राहिले माझे ? "  रोज एकदा सगळी पुस्तके काढून साफ करणे हा तिचा नित्यक्रम झाला होता. आणि तिला सफाई करताना पाहून मला सासरी फोन करुन "  सोनी ये गं बाई "  म्हणत आईचाओला आवाज ऐकणे हा माझा नित्य क्रम झाला होता. फोन ठेवताना " देवा काकूला सोडव " हे वाक्य नकळत निघून जायचे.

काकू मात्र नवऱ्याला प्रसिद्ध झालेले पाहिल्याशिवाय नाही जाणार असे ठाम ठरवून असल्यासारखी आपला क्रम जगत होती. आम्ही अधून मधून जाऊन भेटत होतो. एकदा गप्पा मारताना एका सेवाभावी संस्थेसाठी काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीने मला काकांच्या कवितांचा कार्यक्रम करुन बाहेर त्या पुस्तकांचा खप करायला stall  लावावा असे सुचवले . आणि तिच्या कल्पनेला मूर्त रूप आले . ६० पुस्तके खपली आणि त्याचे पैसे घेऊन मी काकुकडे आले. तिने ते काकांचा फंड असलेल्या डब्यात टाकले आणि " त्यांचे आहेत बाई त्यांनाच राहू देत " असे म्हणाली.

एक दिवस आई चा फोन आला . अगं काकूने बोलावले आहे म्हणाली. काकू कडे आल्यावर तिने मला एक पत्र दाखवले. काकांचे पुस्तक वाचून कोणीतरी त्यांना पाठवलेले पत्र . " सोने हे असे पत्र आले कि त्या पत्रांचे पुस्तक छापायचं गं " असे म्हणत तिने तो कागद माझ्या हातात दिला. " आता हा दारातला पहा कसा हसतोय . म्हणाला बाकी पत्र सोनी आणि तुझा गोतावळा करेल गोळा . आणि छापेल पुस्तक . आता तुझी वेळ झाली. कविराज वाट पाहत आहेत म्हणतोय पहा कसा. ते गेले तेव्हापासून दारात उभा आहे हा असा . रोज त्याला सांगते थांब रे एक पत्र आले कि लगेच निघू. मी माझी कामे केली. कोणी खरेदी करेना म्हणून मग रद्दी वाला आलेला म्हणाला आजी चला एक रुपया जास्ती देतो किलोला , म्हणून त्याला ती पुस्तके विकली. रद्दीच्या दुकानातून पण लोक घेतात गं पुस्तके. तू आलीस आणि मघाशी सखाराम चा मुलगा आणि बाकी रसिक लोक येऊन गेले. आता तुला चहा देते थांब "  असे बोलत ती हातात चहा घेऊन आली.

" सोने आता परत येऊ नकोस बाई . मला मग कवितांची आठवण येते, आता रसिक आहेत त्यांचे . पहा पत्र आले आहे. आता तुम्ही रसिक मंडळातल्या लोकांनी इथे येऊ नये हि इच्छा आहे म्हणून आज सगळ्यांना शेवटचं बोलावून चहा पाणी केले . सहज आई कडे आलीस तर ये गो बाई माझी. पण काकासाठी आणि काकुसाठी अशी नको येउस . मला त्रास होतो. "

" काकू पण ... " यापुढे काकूने मला बोलूच नाही दिले.  आज किती दिवसांनी दिसतेय असे वाटले तिला  बाजारात आज पाहिल्यावर. जाऊन मिठी मारावी आणि खूप रडून घ्यावे असे वाटले. पण तिची आज्ञा....  तिला शेवटचे भेटले २ महिन्यांपूर्वी आणि आज पहिले.  " काकू " मी हाक मारल्यावर तीच येऊन मिठी मारून रडायला लागली " सोने येत जा गं . ते मला एकटीला कविता ऐकवतात. फार फार त्रास होतो. आणि तो दारातला मला इथून नेत नाही. वेड लागेल गं मला एकटीला ... "

" येईन गं काकू . करमत नाही मला पण " असे म्हणून मी पण पोटभर रडले. आल्या आल्या सगळ्या रसिक लोकांना फोन करुन काकुकडे जमायला सांगितले. आणि संध्याकाळी  काकूला हसवण्याचा  बेत केला.  

सोबती असेन मी दुरावालास तू तरी..... अशी एकदा काकूने काकांना कवितेत सुधारणा सुचवलेली .. तेच आठवले. ती काकांच्या कवितांची खरी रसिक होती, निस्वार्थी आणि दर्दी. कविता मनापासून जगली आणि तिनेच ती कविता काकांच्या मनात जगवली  .

पण तरीही आता सोबत पुरे . देवा काकूला सोडव असे मनापासून वाटले . नेहमीप्रमाणे आणि पुन्हा एकदा !!!  

Thursday, May 6, 2010

सोशल कंडिशनिंग

माझ्या मागच्या लिखाणात प्रतिक्रियांमध्ये सोशल कंडिशनिंग असा कोणी तरी उल्लेख केला आणि त्याच्याबद्दलच लिहावेसे वाटले.

गेले काही दिवस माझ्या भोवताली अशा काही घटना घडत आहेत कि सोशल कंडिशनिंग हि असली मूर्ख कल्पना कोणी आणली ? आणि त्याचा परिणाम काय होत आहे ? असले परिणाम कशासाठी ? असे वाटायला लागले .

त्यातच डॉक्टर राजीव शारंगपाणी यांचे एक पुस्तक आज वाचनात आले. आणि मग हा माणूस करतो आहे तसा विचार सगळेच लोक का नाही करत असे वाटले. ( त्यातले काही विचार माझ्या आत असलेल्या भारतीय मुलीला पचले नाहीत पण तरीही लिखाणाचा मनावर परिणाम झाला कुठेतरी ) म्हणून हा प्रपंच !!!

सुरुवात अगदी सध्या उदाहरणाने केली तर परवा आमची एक मैत्रीण तयार झाली आणि मग म्हणाली कि " मला हा असा पिवळा धमक ड्रेस फार आवडतो अगं , आणि माझ्यावर हा छान पण दिसतो पण मी हे घालून गेले तर माझ्या ग्रुप मधले लोक काय म्हणतील ?? " सोशल कंडिशनिंग .....

' मला आवडते ते मी करणार ' असा विचार का नाही होत ?? घातला ड्रेस हसले लोक " हसतील त्यांचे ( पुढे आम्ही घासलेले असे म्हणतो ) दात दिसतील" असा विचार का नाही होत ??

एक पाऊल पुढे जाऊन सांगायचे तर ... माझी एक मैत्रीण प्रेमात पडली . मुलगा छान..... दिसायला , वागायला , आणि तिच्यासोबत एम बी करणारा होता , नोकरी पण अगदीच छान होती. फक्त तो तिच्या जातीतला नव्हता . म्हणजे म्हणायचे झाले तर दोघे एकाच जातीचे होते पण ती त्या जातीतल्या उच्च कुळातली होती. म्हणून घरच्यांनी भेटून त्याला समजावले आणि तिला ते म्हणाले " अगं आपल्या जातीतले लोक काय म्हणतील ?? काय पाहिलेस त्याच्यात ?? जात कुळ तरी पहायाचेस नं ?? " सोशल कंडिशनिंग ..... " ती सुद्धा मला तो आवडला आहे ... असे ठामपणे म्हणू शकत नाही " आणि मग आता तिच्यासाठी बळजबरीने मुले पाहणे चालू झाले आहे .

परिणाम ??? ती आता पळून जाण्याच्या विचारात आहे . आणि अगदीच एक दोन वेळा मोठ्यांना समजावण्याचे प्रयत्न निष्फळ झाले तर ते होईल सुद्धा . सोशल कंडिशनिंग च्या प्रयत्नात आई वडील तिला चुकीचे ( समाजाने चुकीचे म्हटले आहे ) असे काहीतरी वागायला प्रवृत्त करत आहेत . हे असे किती तरी मुलींच्या बाबतीत होते. आणि मग एक तर बळजबरी च्या लग्नात त्या संसार रेटत राहतात ...... आणि धाडस झाले तर पळून जातात . आता पळून गेली हि चर्चा होणे काय आणि जातीतला मुलगा नाही तरी लग्न करून दिले हि चर्चा होणार काय ??? एकच नं ??? सोशल कंडिशनिंग च्या प्रयत्नात अब्रू ( जिचे इतके अवडंबर केले ती ) जाणारच नं ?? त्यापेक्षा अगदीच मुलीचे अहित असेल ते तिला योग्य पद्धतीने सांगून किंवा मुलगा चांगला असेल तर भलत्या भानगडीत पडून लग्न लावून देणे हे शांततेचे मार्ग लोक विसरून जातात.

आणखीन एका प्रकारात मुलाने लग्न मोडले ... " अरे लोक काय म्हणतील याचा विचार केला आहेस का ?? " हे त्याला ऐकवण्यात आले . " तुम्ही जरा माझा विचार करा आणि लोक काय म्हणतील त्याचा नंतर " असा जबाब त्याने दिला. काही भेटीत मुलगी नाही आवडली तरी त्याने लोकापवादास्तव ते लग्न ठरले आहे म्हणून रेटणे कितपत योग्य आहे ?? देवच जाणे . पण त्याने घेतलेला निर्णय पुढचे १० प्रकार वाचवत आहे . पुढे जाऊन घटस्फोट , वैवाहिक जीवनात ताण तणाव असू शकतील हा विचार सोशल कंडिशनिंग च्या मागे धावताना होतच नाही.

माझ्या मागच्या कथेतल्या मुलीने सुद्धा आपल्या बहिणीचे लग्न कसे होईल असा विचार करत १० वर्षे त्रास सहन केला आणि आता बहिणीचे लग्न ठरलेले आहे म्हणून ती सहन करणार होती, हे ऐकून तिचे कौतुक करू कि कीव करू असे वाटले . बहिणीच्या सासरचे लोक काय म्हणतील हि भीती . सोशल कंडिशनिंग चे एक रूप. आधी लग्न ठरेल का आणि ठरलेले लग्न मोडेल का ?? पण... मला त्रास होत आहे आणि मी सहन नाही करणार.... असे म्हणून वेळीच निर्णय घेतला गेला असता तर मग पुढे झालेले किती तरी त्रास वेळीच मिटले असते.

या सगळ्या घटना घडताना लोक काय म्हणत होते ते पाहूयात आता   .... कोणी म्हणाले " आज काल च्या पिढीला आपले दुक्ख कळत नाही . शेवटी आपल्याला समाजात राहावे लागते . हे इतके सोपे नसते " , " लग्न ठरवताना अक्कल नव्हती ?? आता पुढच्या लग्नाला किती अडचणी येतील ?? ( हे वाक्य बोलणाऱ्या काकूचे सुनेशी पटत नसते आणि तिचा मुलगा पण बायकोला वैतागलेला असतो.थोडक्यात ते चुकलेला निर्णय रेटत असतात आणि आपली सोशल इमेज जपत राहतात . मानसिक त्रास होतो पण सांगणार कोणाला ??  ) , " सासूने त्रास दिला नाही का आम्हाला कधी ?? असे चालायचेच " ( हे वाक्य बोलणाऱ्या काकू ची मुलगी वेगळी झालेली असते . तिला हा नियम नसतो ) , "ड्रेस किती भकास असतात तिचे ?? पिवळा काय अरे?? " ( तिला आवडला.... तिने घातला .... आणि हे असले वाक्य बोलणार्याने केशरी pant वर लाल शर्ट घातलेला असतो )

सोशल कंडिशनिंग स्वतः वर जे लागू करून घेतात त्यांच्या तर नैसर्गिक विधिना सुद्धा ते लोक काय म्हणतील याचा विचार करून ते जात असतात . ( म्हणजे प्रवासात !!! गैरसमज नको !!! ) तेव्हा आत्ता हे आपल्याला असे वाटत आहे असा विचार होत नाही.हि मनाची आणि शरीराची गरज आहे आणि व्हायला हवे असे वाटणे महापाप वाटते त्यांना .

आता पुस्तकातले एखादे वाक्य तरी टाकायलाच हवे ...... पुस्तक " चतुर साहचर्य " या बद्दल होते . त्यात त्यांनी छान उदाहरण दिले होते आणि ते सोशल कंडिशनिंग कसे असते त्यात फिट बसत आहे म्हणून लिहित आहे ( थोडी धाडसी वाटली वाक्य तर क्षमा !! मी पण जरासे सोशल कंडिशनिंग पाळते इथे !! लिखाणातला विरोधाभास !! ) " माणूस सुख शोधात असतो, लहान मुलगा त्याच्या लैंगिक अवयवांशी खेळत असेल . तर तेव्हा त्याला पहिल्यांदा सुखाची अनुभूती येते .. आणि आपण त्याला रागावून सांगतो " असे घाणेरडे पणा नाही करायचा " ... बरे नाही म्हणाले कि मग ते हवेसे वाटते आणि मग त्यातून चोरून वागायची वृत्ती निर्माण होते त्यातून मग कसले तरी video पाहणे चोरून काहीतरी वागणे सुरु होते "

उदाहरणाचा संदर्भ सोडू पण त्याचा आशय मात्र मला आवडला सोशल कंडिशनिंग पाळण्याच्या प्रयत्नात आपण चुकीच्या वागण्याला प्रवृत्त करतो आणि त्याला नकळत आपण support करतो. म्हणजे धडधाकट भिकारयाला भिक देऊन आपण त्याला " माग रे भिक... काम नको करूस ...आमच्यासारखे देतीलच " असे सुचवण्यासारखे आहे .

फक्त त्याला आपण भिक मागू नकोस हे सांगत नाही  आणि मग भिक मागण्याचे चुकीचे काम करायला आपण त्याला प्रवृत्त करतो . आणि घरात आपण ...करू नकोस , असे नको , चांगले नाही असे म्हणून त्यांना चुकीचे वागायला प्रवृत्त करतो .

मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करणारी मुले असोत , मुलीला सासरी कोणी काही म्हणू नये म्हणून ऐपत नसताना भरमसाठ खर्च करून मुलीचे लग्न करणारे पालक असोत , मुलाला मार्क कमी पडले तरी त्याला डोनेशन देऊन कुठेतरी शिकायला पाठवणारे पालक असोत . सगळे लोक अवास्तव कल्पनांनी समाजात आपल्याला कोणी काही म्हणेल म्हणून मन काय म्हणत आहे याच्याकडे लक्ष देत नाहीत.

मग पुढे हुंड्यासाठी मुलीला मारून टाकणे , मुलांनी अभ्यास न केल्यामुळे त्यांनी नापास होणे , मुलांनी आई वडिलांच्या अब्रू ( ? ) चा विचार करून कमी मार्क पडले म्हणून जीव देणे हे प्रकार पेपरातले कॉलम च्या कॉलम भरून लेख लिहिण्याचे विषय बनलेत . पण त्यामुळे सोशल कंडिशनिंग काही थांबले नाही आहे .
" घालवा असे वागून बापाची आणि आईची अब्रू घालवा " , " लोक काय म्हणतील हे असे करू नकोस " . असल्या वाक्यांना थाराच दिला नाही तर ???

" हे असे केले न तर तुझ्यासाठी चांगले नाही " , " हे असे केलेस न त्यापेक्षा असे करायला हवेस , खूप फायदा होईल " " तुला वाटते न मग होऊन जाऊ देत " असे संवाद झाले तर त्यातून तन तणाव, भोवताली घडणारे किती तरी प्रकार टळतील .

सोशल कंडिशनिंग पेक्षा पर्सनल कंडिशनिंग केले तर घरातले वातावरण आनंदी आणि हसरे होईल.

" कधीतरी वेड्यागत वागायला हवे " हि संदीप खरे ची कविता म्हणूनच मला फार आवडते मग तिनेच या लेखाचा शेवट करूयात . आणि पर्सनल कंडिशनिंग अमलात आणायला लागुयात.

कधीतरी वेड्यागत वागायला हवे

भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे
उगाचच सखीवर चिडायला हवे
मुखातून तिच्यावर पाखाडता आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

मनातल्या माकडाशी हात मिळवून आचरावे कधीतरी विचारावाचून
झाडापास झोम्बुनिया हाती येत फळ ........
सहजपणाने ते हि फेकायला हवे.
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

कधी राती लावूनिया नयनाचे दिवे , पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे
शोधुनिया मनातले दुमडले पान...... मग त्याने आपल्याला चाळायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

स्वतःला विकून काय घेशील विकत , खरी खरी सुखे राजा मिळती फुकट
हपापून बाजारात मागशील किती ,
स्वतःतच नवे काही शोधायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा आणि तुला बदल हि कशासाठी हवा ?
जुनेच आहे अजून रीयाजावाचून ....
गिळलेले आधी सारे पचायला हवे .
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

नको बघू पाठीमागे येईल कळून  , कितीतरी करायचे गेलेले राहून...
नको करू त्रागा असा उद्याच्या दारात.....
 स्वतःलाही कधी माफ करायला हवे .

कधीतरी वेड्यागत वागायला हवे

अर्थात काही गोष्टींमध्ये समाज मर्यादा आणि  कौटुंबिक मर्यादा योग्य वेळी योग्य ठिकाणी पाळायलाच हव्यात. त्यातूनच तर परफेक्ट पर्सनल कंडिशनिंग  होईल ना? पर्सनल कंडिशनिंग  मधून अपोआप सोशल कंडिशनिंग होईलच आणि तेही विनासायास .

मग वागुयात न कधीतरी वेड्यागत