Thursday, September 9, 2010

ती गेली तेव्हा..

" ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता " .... गाण्याचे शब्द कानावर पडले आणि अभिनव च्या गालावर त्याच पावसाचे थेंब ओघळले... ती जाऊन आज २२ वर्षे झाली.

" अनुज्ञा गेली. "  चे शब्द कानावर आदळले . आणि अभिनव कोसळला.

अनुज्ञा विमानतळावर त्याला सोडायला आली तेव्हाच तिला शेवटचे पहिले होते...किती आनंदात होती ती !! ती आई होणार होती . अभिनव ला तर तिला कुठे ठेवू नि कुठ नको असे झाले होते.

तिचे हास्य अजूनही तसेच.....नजरेसमोर तरळत होते ..ते सगळे चित्र...त्याला आवडते म्हणून तिने घातलेला पांढरा शुभ्र फ्रॉक !! किती सुंदर दिसत होता तिच्यावर. "हि छोटी मुलगी आता आई होणार का ?" अस म्हणत सगळ्यांनी तिची किती चेष्टा केलेली. आणि " असू देत हा मोठा माणूस तर बाप होणार आहे न ?? " असे म्हणत ती पण प्रत्येक चेष्टेला उत्तर देत होती.

अभिनव पण तिच्या सोबत बालपण जगत होता. मोठ्यांमध्ये किती सहज मोठी होऊन जायची ती. आणि लहान मुलांना तर ती प्रचंड आवडायची.

" अभिनव मला न छोतू  बेबी गल पाहिजे....... माझ्यासारखी छोतुशी !! " ...."बाप रे बाप म्हणजे मला दोन दोन लहान मुलांना सांभाळायला लागणार ....  त्यापेक्षा एक मोठा मुलगा... या मोठ्या माणसासारखा " .."" नाही हम्म दोन दोन नाही ... छोटू गल आली न कि मी मोठी होणार ...नको ....तूच मोठा चांगला रे !! नाहीतर मला खाऊ कोण आणेल ? " अस म्हणत असताना आपल्या हसण्यात सामील  झालेली अनुज्ञा आठवली आणि .... अभिनव पुन्हा कोसळला ....  तो मनातून कोसळून गेला होता पूर्णपणे ... विमान प्रवासातले उरलेले १२ तास त्याला नको नको झाले होते. तिचा हसरा चेहरा आता निष्प्राण कलेवारासारखा दिसेल या कल्पनेनेच त्याला गिळून टाकले .

 मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता ... 

हृदयनाथांचे शब्द कानावर आले आणि अनुज्ञाच्या आठवणीने मनावर  आलेले मळभ अजूनच वाढले.त्याने ओघळणार्या अश्रुना वाट मोकळी  करून दिली. 'हुबेहूब तशीच दिसते न आयुषी ?' या कल्पनेने क्षणभर सुखावला आणि स्वतःशीच हसला ..विमानातून दिसणारे दृश्य खरच सूर्य किरणांना सोडवत असल्यासारखे वाटत होते त्या दिवशी.

" अभिनव बाळा मुलगी झाली रे पण आपले बाळ गेले ... अनुज्ञा गेली."दुपारी अनुज्ञा च्या बाबांचा फोन आला

सकाळी अनुज्ञाला दवाखान्यात नेतानाच कल्पना आलेली कि आता हे मुल काही जन्माला येणार नाही. पण अनुज्ञाला काही होऊ नये म्हणून मनातून किती तरी वेळा नकळत हात जोडलेले त्याने . मिळेल त्या विमानाने परत ये हा फोन आला तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच पण ........अनुज्ञाला काही.......  छे मन चिंती ते वैरी न चिंती असा म्हणून त्याने दुर्लक्ष केलेले.. .आणि दुपारी अनुज्ञा च्या बाबांचा फोन आला ....सगळेच संपून गेल्यासारखे झाले ...

पांढरा शुभ्र फ्रॉक  ... गळ्यात मंगळसूत्र आणि जरासेच वाढलेले ते पोट घेऊन धडपडत  विमानतळावर आलेली अनुज्ञा नजरेसमोरून काही केल्या जात नव्हती. तिला "छोटू बाल येताना मी थांबेन हो माझ्या बाळासोबत " असे दिलेले वचन सुद्धा पाळता न आल्याची खंत त्याला आतल्या आत पोखरून टाकत होती. सातव्या महिन्यात हे असे काही घडेल याची कल्पना सुद्धा कोणी केली नव्हती .

विमानतळावर घ्यायला आलेला तिचा भाऊ पाहून तो कोसळला " अविsssssss.........हे काय रे ?? मला माझी अनु आणून दे अवि " असे म्हणत त्याने टाहो फोडलेला !!

अवि सोबत रत्नागिरी पर्यंतचा प्रवास संपेपर्यंत तो जरासा सावरला !! मुलगी झाली हि बातमी अशी ऐकायला मिळेल अशी कल्पना सुद्धा त्याने केली नव्हती !! हुबेहूब अनुसारखी दिसते या वाक्यावर पुन्हा एकदा अनु नजरेसमोर आली आणि त्याने आपला हुंदका आवरला ..

 अंगणात बरीच गर्दी जमलेली. बरेच लोक येऊन गेले होते. बर्फावर ठेवलेला तिचा देह पाहून अभिनव कोसळला !! अविला मिठी मारून त्याने पोटभर रडून घेतले . " फाज्जील उगाच बर्फ नाही हम्म... मला गार सहन नाही होत अजिबात .." तिच्या अंगावर शिमल्यात बर्फ उडवला तेव्हा तिची प्रतिक्रिया अशीच होती . आणि तिचे कलेवर असे बर्फात ?? त्याची वाट पाहत होती न ती ?? पण अशी ???

ती आई होती म्हणुनी घन व्याकूळ मी हि रडलो ... त्या वेळी वारा सावध ss...  पाचोळा उडवीत होता

या ओळी कानावर आल्या  .....

"अभिनव ... मुलगी ....." असे म्हणत अनुज्ञाच्या वाहिनीने आयुषीला हात दिले आणि " अनु आहे रे आपल्याsssत हि पहा " असे म्हणत अवीने त्याच्या खांद्यावर डोके ठेवून हमसून हमसून रडायला सुरुवात केलेली .  आणि मग हातातले मुल सावरत रडणारा अभिनव आणि अवि ....बाजूला अनुचा निपचित देह ...हे दृश्य अभिनव च्या नजरेसमोर आले .

"तिला न्यायची सोय झाली आहे अभिनव. फार वेळ आता ठेवायला नको ..." गर्दीतून कोणीतरी मोठ्यांनी सुचवलेल्या वाक्यानिशी अंत्ययात्रेची सुरुवात झालेली . तिन्हीसांजा तिला निरोप देऊन सगळे परतले . घर शांत होते. पूर्ण  वाड्याला संजीवनी देणारी अनुज्ञा नव्हती. घर अंधारून आले होते. अंगणात रडणाऱ्या आयुषी ला घेऊन अनुज्ञा ची वाहिनी चकरा मारत होती. याच अंगणात अभिनव अनुज्ञा सोबत लहान मुलासारखा उड्या मारत खेळत होता ... तिथे तिच्या मुलीला खेळवायला तीच नव्हती...

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

त्या दिवशी अभिनव एकटा झाला होता . अनुसोबतचे अवखळ अल्लड क्षण आता संपले होते आणि ते तसेच पुन्हा कधीच जगता येणार नव्हते. उरली होती फक्त एक कधीही न भरून येणारी पोकळी !! विचारात हरवलेला ... आयुषीच्या आयुष्याला उजेड देण्यासाठी अनुज्ञा ने तेवत ठेवलेला ...एकटाच ..... अभिनव !!

" बाबा रे तुला किती वेळा सांगितले... हे गाणे लावायचे नाही म्हणून ... हे गाणे ऐकलेस कि उगाच रडत बसतोस ... आणि अंधार काय केला आहेस हा खोलीत ??  चल चल उठ.. " आयुषीच्या आवाजाने तो भानावर आला . दिव्याचा उजेड खोलीत पसरला आणि समोर ... पांढऱ्या शुभ्र फ्रॉक मध्ये ... अनुज्ञा ??? ... अनुज्ञा चा भास .. आयुषी !!  ....... अनुज्ञा ने दिलेली अनमोल भेट .....

1 comment:

  1. कथा वाजताना गाणं पार्श्वभूमीवर वाजतंय असा भास होत होता. अप्रतीम लिहीलंय.

    ReplyDelete