Tuesday, March 1, 2011

मला भेटलेल्या आजी

सावरकर स्मृतिदिनाच्या दिवशी मी आणि माझा नवरा एकत्र त्याच्या आई बाबांच्या निवेदनाला ऐकण्यासाठी मुद्दाम पुण्याहून पेण ला गेलो होतो . त्यांनी नेहमीच्या कामा व्यतिरिक्त केलेले हे पहिलेच सादरीकरण असावे कदाचित . पण ते त्या दिवशी एकत्र पहिल्यांदाच कार्यक्रम सादर करणार होते आणि आम्हाला भारी कौतुक म्हणून आम्ही पेण ला गेलो होतो. संध्याकाळी कार्यक्रम जोरदार झाला. सावरकरांवर आधारित गोष्टी आणि मग त्यांना बहारदार बनवणारे आई बाबांचे निवेदन आणि सोबतीला सावरकरांच्या कवितांनी केलेली वातावरण निर्मिती . या सगळ्यानंतर बराच वेळ आमचा पाय निघत नव्हता तिथून . आई बाबांना लोकांनी गराडा घातलेला आणि त्यांचे कौतुक चाललेले होते .  मी नवीन सून अनोळखी वातावरणात इकडे तिकडे पाहत बसलेले.

मी माझ्या साडीला सावरत बाजूला बसलेले. तेवढ्यात एक तरुण मुलगी आली . माझे छोटे छोटे केस आणि त्याच्यावर साडी असे रुप पाहून ... " तुम्ही मराठी साहित्य मंडळातल्या आहात का ?" असे विचारून गेली . "नाही ....पेहरावावरून शहरातल्या  वाटता म्हणून विचारले " असे म्हणून पुढे गेली . मला अचानक मी प्रभावी वगैरे वाटतेय कि काय असे वाटले .

इतक्यात एक आजी समोर आल्या . अंगात ढगळ म्हणावा असा एक भडक निळ्या रंगाचा सलवार कमीज अडकवलेल्या , तोंडात दात नसलेल्या , अतिशय कृश म्हणावे अशी शरीरयष्टी असलेल्या त्या आजी माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या , " तुम्ही इथल्या नाही दिसत . मराठी साहित्य मंडळात आहात का ? तुमच्याकडे पाहून तुम्ही काहीतरी वेगळे काम करत असाव्यात असे वाटले. मग मनातून वाटले कि तुमच्याशी बोलावे . " असे म्हणत जवळच्या कापडी पिशवीत हात घालत त्यांनी एक कागद बाहेर काढला !! " मी हे लिहिलेले . माझ्या शेजारी एक जण राहतात न त्यांना दाखवलेले मी हे लिखाण ... मी पुण्याच्या स . प  ची विद्यार्थिनी . मला शिकवायला पु ग सहस्त्रबुद्धे होते . त्या वेळेपासून लिहिते मी. पण हल्ली वाचायला कोणी नसते. आम्ही दोघेच इथे राहतो . मुलगी परदेशात आहे आणि मुलगा ठाण्याला असतो . मी सावरकर भक्त आहे एकदम  !! आणि आज मी हे वाचायला घेऊन आले होते. पण कार्यक्रम संपेपर्यंत कोणाला सांगू नाही शकले कि मी लिहून आणले आहे आणि मला हे वाचून दाखवायचं आहे . तुम्ही हे वाचाल असे वाटले. "  असे म्हणत त्यांनी एक कागद पुढे केला. सावरकरांचे चित्रच त्यांनी काढले होते. त्या कार्यक्रमातून आले समोर ते इतिहासातले सावरकर आणि या आज्जीच्या लेखणीतून समोर आले ते तिला आवडलेले ... तिने पाहिलेले सावरकर .

काय योगायोग असतो न ?? खूप दिवसात काहीच लिखाण न करू शकलेली मी आणि खूप काही लिहून कोणाला वाचायला देऊ न शकलेली आजी असे आम्ही  अशा वेळी समोर यावे . तिने पण नेमका मलाच कागद द्यावा . आणि मला माझ्याच वयाची लाज वाटावी . ७५+ वय असेल नक्कीच त्यांचे . आणि मी लग्नानंतर ३ च महिन्यात आळशी झाले आहे. गोष्टी मनात येतात पण कागदावर लिहिल्या जात नाहीत . वेळ मिळत नाही .... असल्या मूर्ख सबबी सांगत असते. मी मनातून ओशाळून गेलेले. ते लिखाण अगदी भाषण करण्याच्या तयारीत लिहिले असावे असे वाटत होते. पण आजींच्या वयाकडे पाहता .. फारच छान . शुद्ध भाषा , स्पष्ट विचार आणि सुसंगत मांडणी .

 " मी पण लिहिते. तुम्ही फारच छान लिहिले आहे. तुमची हरकत नसेल तर मी ते  तुमच्या नावाने इंटरनेट वर लिहीन . लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला पोस्टाने पाठवेन . मी हे xerox करून घेतले तर काही हरकत नाही न ?? "   " मी देते न स्पष्ट xerox मिळतात न त्या दुकानातून आत्ता काढून आणते , देव पावला बाई ... मला वाटलेच तुमच्याशी बोलावे असे , कोणी वाचायला नसते न घरी म्हणून मग मी असा कोणी वाचले कि खुश होते एकदम . देवानेच सांगितले मला तुमच्याशी बोलायला . तुमची तंत्रज्ञ भाषा काळात नाही मला. पण मी इंटरनेट वर कसे पाहीन माझे लेखन ?? मी शिकेन पाहिजे तर .. म्हणजे माझा लेख इंटरनेट वर कसा दिसतो कसे कळेल ? "  .

 " कागद द्या माझा नवरा काढून आणेल xerox . तुम्ही नका धावपळ करू . " असे म्हणत मी त्यांच्या हातातला कागद काढून घेतला आणि नवर्याला नजरेनेच आज्ञा केली आणि तो पण आजींच्या कौतुकात सामील होत दुकान शोधायला बाहेर पडला. पण रात्र बरीच झालेली . त्यामुळे दुकाने बंद झाली होती . कागद हलवत तो परत आला. मी त्यांना माझा पत्ता दिला " या पत्त्यावर पोस्टाने पाठवा ,मी तुमचे लिखाण तुमच्या नावाने सगळ्यांना वाचायला देईन . चालेल न ? " असे म्हणत माझा पत्ता त्यांच्या हातात दिला.  त्या खूप खट्टू झालेल्या खऱ्या पण दुकाने बंद झालेली त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नव्हता . त्यांनी मला त्यांच्या सुंदर अक्षरात त्यांचा पत्ता आणि फोन नंबर दिला. आणि माझा आणि त्यांचा संवाद सुरु झाला.

दूर बसलेल्या माझ्या दिराला हि आजी हिला बोर करतेय कि काय असे वाटल्याने त्याने मला बोलावून घेतले आणि मग मी काय करणारे हे ऐकून खुश झाला आणि मला म्हणाला कि जा आपण घरी गप्पा मारू. आत्ता जाऊन तू त्यांच्याशी गप्पा मार .

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणत्याही फोटो मध्ये नाही दिसणार असा होता. बोळक्यात दात नसताना ते दाखवत बाहुली मिळाली कि हसून दाखवणारी लहान मुलगी आणि हि आजी यात काहीच फरक नव्हता वाटत . त्या भरभरून त्यांनी कोणकोणत्या विषयांवर लिहिले आहे हे बोलत होत्या. " सगळे जण सावरकरमय झाले तरच या देशाचे खरे आहे  "  इथपासून " असे आमचे गणपती आणि असा आमचा उत्सव " पर्यंत सगळ्या लिखाणांची मला माहिती मिळाली होती. आता ते सगळे लेख वाचायला कधी मिळतील असे मला झाले आहे .

त्यांचे लेखन मला पोस्टाने मिळाले कि त्यांच्याच नावाने मी मा बो वर लवकरच प्रकाशित करेन. त्याच्यावर सगळ्यांनी जरूर प्रतिक्रिया टाकाव्यात म्हणून लिखाणाचा हा खटाटोप .

आजींचे लेखन घेऊन लवकरच मा बो वर येईन आणि तेव्हाच त्यांचे नाव पण सगळ्यांना सांगेन . तोपर्यंत हा लेख वाचणार्यांचे आभार  !!

2 comments:

  1. fabulous......upcomming marathi chya rowling bai

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलयस. तू पेणला जाण आणि त्या तुला भेटणं हा किती छान योगायोग!

    ReplyDelete